प्रतिनिधी / वाई
चुकीच्या पद्धतीने मतदारसंघ पुनर्रचना झाल्याने तसेच मतदारसंघाचे आकारमान मोठे झाल्याने खासदार आणि आमदारांचा निधी हा फारच तोकडा पडतो आहे. त्यामुळे महानगरातील लोकप्रतिनिधींचा निधी कमी करून तो इतरत्र वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खा. उदयनराजे भोसले यांनी केले. वाई पालिकेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उदयनराजेंनी वाईला बैठक घेतली या वेळी ते बोलत होते. नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे मुख्याधिकारी विद्या पोळ नगरसेविका रुपाली वनारसे विकास शिंदे. अॅड. दत्ता बनकर आदी उपस्थित होते.
मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये मतदारांच्या हिताचा विचार करण्यात आलेला नाही. तर राजकीय सोयीच्यादृष्टीने पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे मतदारांचे फार मोठे नुकसान झाले. चुकीच्या पद्धतीने मतदारसंघ तयार केल्यामुळे लोकप्रतिनिधींना मिळणारा निधी व मतदार संघाची मागणी यामध्ये फार मोठा फरक पडत आहे. लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि खासदारांना पाच कोटी रुपये आणि विधानसभा मतदारसंघात तीन तालुके येतात व आमदारांना दोन कोटी रुपये विकासकामांसाठी येतात.
मात्र मतदारसंघाची मागणी मोठी असल्यामुळे निधी अपुरा पडत असल्याची तक्रार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. मुंबई पुणे दिल्ली बेंगलोर आमदाबाद सारख्या महानगरांमध्ये मोठ्या मोठ्या महापालिका असतात, त्यांचा स्वतःचा निधी व तेथील नगरसेवकांचा निधीही मोठा असतो तर ग्रामीण भागामध्ये मतदारसंघ मोठे आणि निधी तोकडा पडत असल्याने विकास कामे करता येत नाहीत. यासाठी महानगरांमधील खासदार, आमदार निधी कमी करून तो देशाच्या ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींचा निधी वाढविल्यास ग्रामीण भागातील अडचणी सोडविता येतील. यावेळी अजित वनारसे, विजय ढेकाणे, तुषार चक्के, पालिका निरीक्षक नारायण गोसावी,सचिन झेंडे आदी उपस्थित होते.
पुणे सातारा रस्ता दुरुस्त झाला नाही तर हा रस्ता स्वतः जेसीपी घेऊन उखडणार – उदयनराजे
पुणे सातारा महामार्ग खराब झाल्याने रस्ते विकास महामंडळाला संबंधित ठेकेदाराचे काम काढून घेण्याबाबत कळविले आहे. रस्ता खराब झाल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे तर अनेकाना प्राण गमवावे लागले आहेत. जर लवकरच रस्ता दुरुस्त झाला नाही तर स्वतः जेसीपी घेऊन रस्ता उघडून टाकणार आहे.