23 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी याकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात उतरणार आहे. सोमवार दि. 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शेतकऱ्यांकडे बघायला सरकारकडे वेळ नाही. व्यापारी पान टपरी वाहनधारकांना मदत केली. परंतु, शेतकऱ्यांना अद्याप दमडीही दिलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी पॅकेज घोषणा करणारा नाही मदत देणार आहे असे म्हटल्यामुळे आम्हाला काहीसं बरं वाटलं होतं. पण महिना झाला तरी ह्या घोषणा अद्याप हवेतच आहेत. मदतीची घोषणाही फुटकळ आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी सोमवार 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. दसरा चौक येथे या मोर्चास प्रारंभ होईल, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली. तत्पूर्वी, सरकारने गांभीर्याने विचार करावा असे आवाहनही त्यांनी केले.
प्रमुख मागण्या
पूरग्रस्त शेतकऱ्यांना बाधित झालेल्या पिकाला घेतलेले कर्ज माफ करावे
कृष्णेच्या उपनद्यांवरील पुलाच्या दोन्ही बाजूला दोन-तीन ठिकाणी पिलर च्या मोऱ्या बांधाव्यात
पुरातील घरांचे पुनर्वसन करावे
नुकसान झालेल्या जमिनीची भरपाई मिळावी.
कृष्णा व उपनद्यांना येणाऱ्या पुरासाठी अभ्यास गट नेमण्यात यावा.
घोषणा झालेली कर्जमाफी तात्काळ द्यावी.
पूर बाधित शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे.
आदी मागण्या मोर्चावेळी करण्यात येणार आहेत. पत्रकार बैठकीला जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील, सावकार मादनाईक, जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष सागर शंभू शेट्टी, रमेश भोजकर, वैभव कांबळे, जनार्दन पाटील आदी उपस्थित होते.
2019 ला ज्यांना शेतीतलं काही कळत नाही असा मी म्हणत होतो. परंतू त्यांनीच कर्जमाफी सह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. याउलट स्थिती सध्याच्या शेतीतील कळत असलेल्या सरकारची आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.
Previous Articleभाजपचे चार केंद्रीय मंत्री राज्यात काढणार ‘जन आशीर्वाद यात्रा’
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.
Related Posts
Add A Comment