मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन : पाटबंधारे प्रकल्पांचे ऑनलाईन भूमिपूजन
प्रतिनिधी / ओरोस:
शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱयांनी फक्त दोन घासच दिले नाहीत, तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेती व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या ‘विकेल ते पिकेल’ योजनेच्या माध्यमातून कोकणवासीयांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मालवण येथील भूमिपूजनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, मालवण तालुक्मयातील मसुरे-आंगणेवाडी लघुपाटबंधारे योजना तसेच मालोंड-मालडी कोल्हापूर पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, रोहयो व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, आंगणेवाडी देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर आंगणे, बिळवस-आंगणेवाडीचे सरपंच मानसी पालव, मालडीचे सरपंच संदीप आडवलकर, कुंभवडे सरपंच सूर्यकांत तावडे, रत्नागिरी जिल्हा जलसंधारण अधिकारी वडाळकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी देवशेट्टी, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते, संदेश पारकर उपस्थित होते.
भराडी देवीच्या साक्षीने वचन!
ठाकरे म्हणाले की, एक जिल्हा एक उत्पादन आणि त्याला बाजारपेठ मिळावी, मालाचा दर्जा चांगला रहावा, त्याची अधिकाधिक निर्यात व्हावी, यासाठी शासनाने ‘विकेल ते पिकेल’ योजना सुरू केली आहे. संपूर्ण कोकणपट्टा सुंदर आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. माझे कोकणावरचे प्रेम मी कधीच लपवले नाही. म्हणूनच मी गेल्यावर्षी भराडी देवीच्या दर्शनाला आलो होतो. तेव्हा कोकणातील योजना आणि व्यथांचा विचार केला. त्यातील अनेक गोष्टी मार्गी लावत असताना कोरोना आला आणि सगळे ठप्प झाले. असे असले तरी कोकणचा विकास मार्गी लावणार आहोत. माझा कोकण संपन्न झाला पाहिजे. त्यासाठी जे करता येईल ते-ते करण्याचे वचन भराडी देवीच्या साक्षीने कोकणवासीयांना देतो.
कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध!
आंगणेवाडी यात्रेत कोरोना काळात गर्दी करू नका, या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल भाविकांना धन्यवाद देतो. माझ्या शक्तीचा कण अन् कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे, असा आशीर्वाद मागताना कोकणच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. भराडी मातेची कृपा म्हणून इतके वर्ष मार्गी न लागलेल्या या तीन योजना आज मार्गी लागत आहेत, याचा निश्चित आनंद आहे.
राज्यात अनेक धरण, पाटबंधारे प्रकल्प झाले. मात्र, अजून काही कामे बाकी आहेत. आता आपण गोसीखुर्द धरणाच्या कामाला गती दिली आहे. आज या तीन पाटबंधारे कामांचे आपण भूमिपूजन ऑनलाईन करत आहोत. पण, धरणाच्या उद्घाटनाला मी तिथे प्रत्यक्ष येईन, हे माझे वचन आहे. अनेकजण स्वतःसाठी काही ना काही मागत असतात. पण कोकणातील लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक, विश्वस्त म्हणून काम करत आहेत. स्वतःसाठी काही न मागता जनतेसाठी रुग्णालय आणि इतर गोष्टी मागत असल्याचा मला आनंद असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तर रोहयो आणि जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी प्रास्ताविकात या तीनही पाटबंधारे योजनांची वैशिष्टय़े, साठवण क्षमता आणि खर्च याची माहिती दिली.