योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा नारायण स्वामी यांचा आरोप
प्रतिनिधी /बेळगाव
अंगणवाडीमध्ये तसेच शाळांमध्ये देण्यात येणारा मध्यान्ह आहार निकृष्ट दर्जाचा आहे. या योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्र्यांनी याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले असून सरकारनेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विधानपरिषद सदस्य नारायण स्वामी यांनी सभागृहात केला. यावर सभागृहाच्या मंत्र्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
लहान मुले, गर्भवती महिला, प्रसूती झालेल्या महिलांना पौष्टिक आहार दिला जातो. लहान मुलांना 8 रुपये तर गर्भवती व प्रसूती झालेल्या महिलांना 21 रुपये दिले जात आहेत. मात्र देण्यात येणारा आहार पाहता त्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून आले, असा आरोप विरोधकांनी केला. त्यावर मातृपूर्ण योजनेमध्ये 21 रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघे मिळून हा निधी देत असल्याचे सभागृहाच्या मंत्र्यांनी सांगितले. निश्चितच त्यामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सभापती बसवराज होरट्टी यांनी पुरवठा करण्यात येत असलेल्या मध्यान्ह आहाराबद्दल चौकशी करावी, असे सांगितले. कोरोनाकाळात या योजनेत अधिक भ्रष्टाचार झाला आहे. कारण आहार न देताही परस्पर निधी लंपास करण्यात आल्याची तक्रारदेखील यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. त्यावर योग्य तो अहवाल देण्याचे आश्वासन सत्ताधारी सदस्यांनी दिले.