प्रतिनिधी/ रत्नागिरी
’कोरोना’चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळा-महाविद्यालयांप्रमाणेच रत्नागिरी जिह्यातील सर्व अंगणवाडय़ा सध्या बंद असल्या तरी अंगणवाडीसेविका आणि मदतनीस गावांमध्ये घरोघरी जाऊन सेवा देत आहेत. गावागावात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडीसेविका, मदतनीसांनी लॉकडाऊनच्या काळाच्या जिह्यातील लहान मुले आणि गरोदर माता अशा एकूण 63 हजार 674 जणांना घरपोच पोषण आहार दिला.
‘लॉकडाऊन’च्या कालावधीत जिह्यातील अंगणवाडीतील बालके यांना सकस आहार, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना पोषण आहार मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदच्या महिला व बालविकास विभागाने उत्तम कामगिरी केली आहे. लॉकडाऊनमध्ये एकही बालक, गरोदर महिला आणि स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. आवश्यक तेवढा पोषण आहार उपलब्ध आहे. हा आहार शाळा, अंगणवाडय़ा बंद असल्या तरी अंगणवाडीसेविकांमार्फत घरपोच दिला जात आहे. त्याबरोबरच सेविका कोरोनाबाबत कोणकोणती काळजी घ्यावी, या बाबत लोकांना माहिती देत आहेत.
कुपोषण, माता-बालमृत्यू ही समस्या दूर व्हावी म्हणून काही विशेष योजना जिल्हा परिषद महिला बालविकास प्रकल्प विभागामार्फत राबवल्या जातात. अंगणवाडीसेविकांमार्फत अंगणवाडय़ा बंद असल्याने सेविका सध्या या मुलांना पोषण आहार घरपोच देण्यावर भर देण्यात आला आहे. स्तनदा व गरोदर मातांना सकस आहार पोहोचवण्याचे कर्तव्य ग्रामीण भागातील ही अंगणवाडीसेविका जबाबदारीने पार पाडत आहेत.
पोषण आहार योजना ही अत्यावश्यक सेवा आहे. सलग काही दिवस ती बंद ठेवता येणार नाही. त्यामुळे करोनाविषयी पूर्ण काळजी घेऊन अंगणवाडीसेविका गृहभेटीद्वारे सध्या ही सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाबाबतही जनजागृती करत आहेत. अंगणवाडय़ा बंद असल्या तरी कार्यक्षेत्रातील लाभार्थी बालके आणि मातांना सेविका आणि मदतनीसांमार्फत आहार दिला जात आहे. आहार वितरण घेताना संबंधित सेविका स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत आहेतच. शिवाय लोकांनाही आवाहन करीत आहेत.