सातारा / प्रतिनिधी :
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस आणि वेगवान वारा आहे. कोंढावळे येथील कातकरी वस्तीत एका छपरात राहणाऱ्या वामन जाधव (वय 65) यांच्या अंगावर गाढ झोपेत असतानाच मध्यरात्री मध्यरात्री छप्पर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वाई तालुक्यातील पश्चिम भागात कोंढावळे गावाच्या हद्दीतील सुतारकी नावाच्या शिवारात ओढ्याच्या कडेला पाच ते सहा कुटुंब छपरां मध्ये राहत आहेत. यापैकी एका छपरात वामन जाधव वयोवृद्ध गृहस्थ एकटेच राहत होते. त्यांची मुले-सुना शेजारच्या छपरात राहत होती. गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम भागात रिमझिम पावसाबरोबर वेगवान वारेही सुरु आहे. जोराच्या वाऱ्यामुळे वामन जाधव यांचे छप्पर मध्यरात्री कोसळले. या छप्पराखाली दबलेल्या वामन यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, वामन जाधव यांचा पावसाने बळी घेतला असून प्रशासनाने यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी. तसेच पश्चिम भागातील कातकरी समाजातील लोकांचे सर्वेक्षण करुन त्याना शासकीय जागा उपलब्ध करुन घरकुल बांधून द्यावीत, अशी मागणी वासोळे गावचे सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नवघणे यांनी केली आहे.