रस्त्यावर घोषवाक्याद्वारे चाकरमान्यांचे तालुक्यातील पाली ग्रामस्थांकडून स्वागत
प्रतिनिधी/ रत्नागिरी
चाकरमान्यांमुळे गावात कोरोना येईल अशी भीती निर्माण झालेली असताना कोरोनामुळे याच चाकरमान्यांची मुंबईतील असलेली परिस्थिती व होणारी हालअपेष्टा हळुहळू गावकऱयांना समजू उमजू लागली आहे. हे चाकरमानी आपलीच माणसे आहेत, परिस्थिती ध्यानात घेत चाकरमान्यांनी नियमांचे पालन करून गावात आनंदाने रहावे असे गावकऱयांना वाटत आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील पाली गावात गावात येणाऱया चाकरमान्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर घोषवाक्य लिहून गावकऱयांनी त्यांचे स्वागत केले आहे.
रत्नागिरी जिल्हा कोरोना प्रारंभाच्या काळात अलिप्त होता. त्यामुळे इतर जिह्याच्या मानाने रत्नागिरी जिल्हा कोरोनाच्या बाबतीत सुरक्षित असल्याचे चित्र होते. या कोरोनाला रोखण्यासाठी येथील गावागावात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे परगावात राहणाऱयांना गावात परतण्याचे रस्ते बंद होते. कारण मुंबईत कोरोनाचा कहर हळूहळू वाढू लागला होता. त्यामुळे मुंबईकर चाकरमानी गावात आल्यास या कोरोनाचा धोका वाढणार हे निश्चित अशी भिती व्यक्त करण्यात आली.
मुंबईत वाढणारा धोका लक्षात घेत गावाकडे वाटणारी सुरक्षितता जाणून चाकरमानी गावाकडे परतू लागले. मोठय़ा प्रमाणावर चाकरमान्यांनी कोकणात धाव घेतल्याने गावातील ग्रामस्थांत भीतीची चलबिचल सुरू झाली. मुंबईहून आलेल्या काही चाकरमान्यांना जिह्यात आल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे सामोरे आले. आता या चाकरमान्यांमुळे गावात कोरोना वाढणार ही भिती कायम होती. पण चाकरमान्यांची मुंबईतील असलेली परिस्थिती व होणारी हालअपेष्टा हळुहळू गावकऱयांना आता समजू लागल्या आहेत. शेवटी हे चाकरमानी आपलीच माणसे माणसे असल्याची भावना निर्माण झाली आहे.
त्यामुळे गावात येणाऱया चाकरमान्यांना गावात, वाडीबाहेर बाहेर अथवा अन्य ठिकाणी राहण्याच्या सुविधा गावकऱयांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सुरूवातीला असलेली चाकरमानी आणि स्थानिक गावकरी ही दरी आता कमी झाली आहे. रत्नागिरीतील पाली गावात येणाऱया चाकरमान्यांच्या स्वागतासाठी तेथील ग्रामस्थांनी रस्त्यावर घोषवाक्य लिहून त्यांचे स्वागत केले आहे. पाली गावाला आपण ‘ग्रीन झोन ठेवूया…घरी रहा…सुरक्षित रहा… अंतर माणसात ठेवा… माणुसकीत नको’… अशा भावनात्मक घोषवाक्ये लिहून त्यांनी चाकरमान्यांचे स्वागतही करण्यास सुरूवात केली आहे. पाली ग्रामस्थांनी दाखवलेल्या या चांगल्या उपक्रमाची अंमलबजावणी जिह्यातील इतर गावांमध्येही झाली तर चाकरमान्यांना आपल्या गावाप्रती आदराची व आपुलकीची भावना निर्माण होणार आहे.