करणीबाधेच्या मनस्तापातून मुलींना पाजले विष; पित्याचाही आत्महत्येचा प्रयत्न : रामनगर-कंग्राळी खुर्द येथील घटनेने संताप
प्रतिनिधी /बेळगाव
आपल्या घरासमोर करणीबाधेसाठी ठेवलेल्या उताऱयामुळे मनस्थिती ढासळलेल्या एका इसमाने आपल्या दोन मुलींना विष पाजून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी रामनगर (कंग्राळी खुर्द) येथे ही घटना घडली असून दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे तर वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. 21 व्या शतकात मानव अंतराळ सफरीवर सहज जाऊन येत असला तरी काही लोक अद्यापही करणीबाधा आणि अंधश्रद्धेत अडकून पडलेले पाहून संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तपास अधिकारीही चक्रावून गेले असून अंधश्रद्धेने दोन कोवळय़ा जीवांचा बळी गेला आहे. इडलीतून मुलांना विष घातल्याचा संशय असून उत्तरीय तपासणी अहवालानंतरच याचा उलगडा होणार आहे.
अनिल चंद्रकांत बांदेकर (वय 45) याने आठ वर्षाची अंजली व चार वर्षाची अनन्या या दोन कोवळय़ा मुलींना विष पाजून स्वतःही विष प्याले आहे. इतकेच नव्हे तर आपले जीवन संपविण्यासाठी त्याने हाताची नसही कापून घेतल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल हा टाईल्स फिटिंगचे काम करीत होता. लॉकडाऊनमुळे गेले दीड-दोन वर्षे कामे कमी होती. त्याची पत्नी जयश्री विजयनगर येथील माहेरी होती. सध्या अनिल, त्याच्या दोन मुली व एक मुलगाही विजयनगरला राहात होते. चार महिन्यांपासून कामे नसल्यामुळे हे कुटुंब रामनगर येथील घराला कुलूप लावून विजयनगरला जाऊन राहिले होते. मात्र, रोज अनिल रामनगर येथे येऊन घरी देवपूजा करून पुन्हा विजयनगर गाठायचा.
घरासमोर बुट्टीत ठेवला करणीबाधेचा उतारा
गेल्या तीन-चार दिवसांपासून त्याची मानसिक स्थिती ढासळली होती. कारण चार दिवसांपूर्वी अनिल रामनगर, कंग्राळी खुर्द येथील घरी गेला होता. पाऊस झाल्यामुळे रात्री विजयनगरला न जाता त्याने तेथेच मुक्काम केला. दुसऱया दिवशी रविवार दि. 11 जुलै रोजी सकाळी त्याने आपल्या घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी घरासमोर एका बुट्टीत करणीबाधेचा उतारा ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्याला मनस्ताप झाला होता.
यापूर्वीही अनेकवेळा घरासमोर उतारे ठेवल्यामुळे तो त्रस्त होता. याच मनस्तापातून देवपूजेला म्हणून नेहमीप्रमाणे अंजली व अनन्या या दोन्ही मुलींना घेऊन अनिल रामनगर येथील घरी पोहोचला. देवपूजेनंतर त्याने आपल्या मुलींना विष देऊन स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, मार्केटचे प्रभारी एसीपी एन. व्ही. बरमणी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, एपीएमसीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री आदी अधिकाऱयांनी सिव्हिल हॉस्पिटल व घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दोन्ही मुलींचा वाटेतच मृत्यू…
सकाळी देवपूजेला दोन मुलींना घेऊन आलेला अनिल विजयनगर येथील सासरी परतलाच नाही. जेवणाची वेळ झाली तरी पती अजून आला नाही म्हणून त्याच्या पत्नीने अनिलशी संपर्क साधला. त्यावेळी प्रतिसाद मिळाला नाही म्हणून पत्नीने घरमालकांशी संपर्क साधला. मालकाने घरी येऊन पाहिले असता दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी ही गोष्ट अनिलच्या पत्नीला कळविली. त्यामुळे अनिलची पत्नी व तिच्या कुटुंबीयांनी रामनगरच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. दरवाजा फोडून आत प्रवेश केला असता अर्धवट खाल्लेली इडली व लॉलीपॉप पडल्याचे दिसून आले. देव्हाऱयावर रक्ताचे डागही पडले होते. तातडीने या तिघा जणांना सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन्ही मुलींचा वाटेतच मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. अनिलवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
साईचरणी वाहिले रक्त…
उपलब्ध माहितीनुसार रविवारी सकाळी घरासमोर आढळलेल्या करणीबाधेच्या उताऱयामुळे अनिल अस्वस्थ झाला होता. कोण आपल्या वाईटावर टपले आहे? याचा सतत विचार घोळत होता. बुधवारी आपल्या दोन मुलींना विष पाजून स्वतःही जीवन संपविण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याने हाताची नस कापून घेतली आहे. देव्हाऱयावरील साईचरणी व शिवप्रतिमेवर रक्त वाहिल्याचे दिसून आले. वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी या वृत्ताची खातरजमा केली आहे. यावरून एका उताऱयामुळे अनिल किती अस्वस्थ झाला होता, याची कल्पना येते. अंधश्रद्धेपोटी लॉकडाऊनमुळे आधीच अडचणीत असलेल्या एका गरीब मजुराच्या कुटुंबाची शोकांतिका झाली आहे. त्याच्या घरासमोर करणीबाधेचा प्रकार करणाऱयांविरुद्ध गावातील जनतेमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे करणीबाधा करणाऱयांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.