3 लाख लोकांचे स्थलांतर, 2 राज्यांमध्ये अतिदक्षता
@ भुवनेश्वर / वृत्तसंस्था
महाविनाशकारी वादळ असा ज्याचा उल्लेख केला जात होता. ते अंफान चक्रीवादळ ओडीशा आणि पश्चिम बंगालच्या सागरतटावर आदळले आहे. मात्र आदळण्यापूर्वीच त्याचा जोर अंशतः कमी झाल्याने आता ते अतितीव्र वादळ म्हणून ओळखले जात आहे. त्याच्या प्रभावामुळे या दोन राज्यांमधील सागरतटीय जिल्हय़ांमध्ये वेगवान वारे आणि जोरदार पाऊस पडत आहे.
वादळाची चिन्हे दिसू लागताच केंद्र सरकार व दोन्ही राज्यांनी आपत्कालीन यंत्रणा क्रियान्वित केली होती. गेल्या दोन दिवसांमध्ये 3 लाख लोकांना स्थलांतरित करून सुरक्षित स्थानी नेण्यात आले आहे. त्यामुळे वादळाच्या पहिल्या तडाख्यात फारशी हानी झालेली नाही. मात्र काही घरे व अनेक झाडे पडली आहेत.
200 किलोमीटर वेगाचे वारे
वादळ आदळण्यापूर्वी ओडीशा व पश्चिम बंगालच्या सहा जिल्हय़ांमध्ये 200 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू लागले. तसेच जोरदार पावसाने या जिल्हय़ांना झोडपून काढले. वीजपुरवठा खंडित झाल्याने संकटात भर पडली. मात्र परिस्थिती त्यामानाने नियंत्रणाखाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सोमवारी दिल्लीत बैठक
सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. तसेच राष्ट्रीय आपत्तीनिवारण दलाच्या आठ तुकडय़ा तातडीने या दोन राज्यांमध्ये पाठविण्याचा आदेश दिला होता. वादळ आदळण्यापूर्वीच बऱयाच लोकांना सुरक्षित स्थळी नेल्याने जीवीतहानी टळली आहे.
ओडीशातील पुरी, केंद्रपाडा, जगतसिंगपूर आणि खुर्दा या जिल्हय़ांमध्ये, मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत आहे. पश्चिम बंगालच्याही दोन जिल्हय़ांमध्ये नुकसान झाले आहे. मात्र या राज्यात वादळाचा जोर निवळला आहे. ओडीशाच्या बालासोर आणि मयुरभंज जिल्हय़ांमध्ये तसेच भद्रक जिल्हय़ाच्या काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. विशेष आपत्तीनिवारण आयुक्त पी. के. जेना यांच्या नेत्वृत्वा आपत्कालीन सुरक्षा कार्य जोमाने सुरू करण्यात आले आहे.
11 लाखांसाठी सज्जता
आतापर्यंत 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असले तरी अजून 11 लाख लोकांना इशारा देण्यात आला असून त्यांनाही हलविण्याची तयारी सुरू आहे. प्रशासनाने वाहने सज्ज ठेवली आहेत. वादळाची तीव्रता बघून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.
41 तुकडय़ा नियुक्त
पश्चिम बंगाल आणि ओडीशा या राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्तींनिवारण दलाच्या 41 तुकडय़ा नियुक्त करण्यात आल्या आहेत. ही माहिती दलाचे प्रमुख एस. एन. प्रधान यांनी दिली. बिनतारी संदेश यंत्रणा, उपग्रहीय दूरध्वनी यंत्रणा व इतर अत्याधुनिक संपर्क यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आणीबाणीच्या स्थितीत लोकांना साहाय्य करण्यासाठी विशेष क्रमांक देण्यात आले आहेत.