लांजा गाव कमिटीचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांना निवेदन सादर; पिढी अंमली पदार्थाच्या विळख्यात; कठोर कारवाई करण्याची मागणी
लांजा प्रतिनिधी
लांजा शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या अमली पदार्थाची विक्री आणि सेवन यामुळे भावी पिढी या अंमली पदार्थाच्या आहारी जात असून त्यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढीस लागले आहे. मात्र या विरोधात पोलीस कठोर कारवाई करीत नसल्याचे आक्रमक झालेल्या लांजावासीयांच्यावतीने शनिवारी १३ मे रोजी सायंकाळी लांजा पोलीस निरीक्षक व लांजा तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान, येत्या १५ दिवसात लांजा शहरात बेकायदेशीरपणे होणारी अंमली पदार्थ विक्री आणि सेवन याविरोधात तातडीने पावले उचलावीत. अन्यथा लांजातील नागरिकांच्यावतीने या विरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे तसेच लांजा नायब तहसीलदार उज्वला केळूस्कर यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची राजरोसपणे विक्री होत असून तरुण पिढी या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याने पालक देखील त्रस्त झाले आहेत. तर काही ठिकाणी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढीस लागले आहे. मात्र अशा प्रकारच्या समाजास घातक ठरणाऱ्या गोष्टींना पायबंद घालण्याऐवजी पोलिसांकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. वेळोवेळी पोलीस यंत्रनेशी येथील नागरिकांनी चर्चा विनंती करून देखील ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळेच शहरात राजरोसपणे अंमली पदार्थाची विक्री सुरू आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण पिढी आहारी गेली असल्याने गुन्हेगारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. यामुळे भावी पिढी मोठ्या प्रमाणात या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे बरबाद होत असल्याने आम्ही नागरिक हे उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. म्हणूनच पुढील १५ दिवसात शहरातील ज्या ज्या ठिकाणी ही बेकायदेशीर होणारी अंमली पदार्थाची विक्री आणि सेवन यावर तातडीने निर्बंध घालावेत. लांजा शहर या अंमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, ग्रामस्थ आणि पोलीस यंत्रणा या दोघांच्या सहकार्याने आपण हे ही कीड नष्ट करूया असे ठोस आश्वासन यावेळी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी लांजा वासियांना दिले. या प्रसंगी निवेदन देताना लांजातील तमाम प्रमुख मानकरी, ग्रामस्थ तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.