अंमली पदार्थ तस्करीचा
बीएसएफची वेळीच कारवाई, तीन पाक घुसखोर ठार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जम्मू-काश्मीरच्या सांबा विभागात अंमली पदार्थांच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ही तस्करी करण्याच्या प्रयत्नात असणाऱया तीन पाकिस्तानी घुसखोर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. रविवारी मध्यरात्री सीमावर्ती भागात ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत घुसखोरांकडून 36 किलो हेरॉईन हस्तगत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत कोटय़वधी रुपये आहे. नव्या वर्षातील हाणून पाडण्यात आलेला हा चौथा प्रयत्न आहे. या चार कारवायांमध्ये एकंदर 9 घुसखोर दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.
अंधाराचा फायदा घेण्याचा प्रयत्न
मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत काही पाकिस्तानी घुसखोरांनी भारताच्या सीमारेषेच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला. स्थानिक हस्तकांकडे अंमली पदार्थ हस्तांतरित करण्याची त्यांची योजना होती. तथापि त्यांच्या कारस्थानाचा वेळीच सुगावा लागल्याने सीमा सुरक्षा दलाने त्वरित कारवाई केली. यावेळी प्रथम घुसखोरांनी गोळीबार केल्याने सैनिकांनीही तसेच प्रत्युत्तर दिले. तीन घुसखोर या कारवाईत ठार झाले. त्यांच्याकडून अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले.
निगराणी साधनांमुळे कारवाई
सीमेवर ठिकठिकाणी सर्व्हेलन्स साधने बसविण्यात आली आहेत. सीमेवरील कोणत्याही मानवी हालचालींची माहिती ही साधने त्वरित देतात. यावेळीही घुसखोरांच्या हालचाली या साधनांनी टिपल्या होत्या. त्या पाहून त्वरित कारवाई करण्यात आली, अशी माहिती इन्स्पेक्टर जनरल डी. के. बूरा यांनी दिली.
चौकशीला प्रारंभ
ठार झालेले दहशतवादी घुसखोर कोणत्याही संघटनेशी संबंधित होते, याचा शोध घेतला जात आहे. तसेच या घुसखोरांचा भारतातील कोणाशी संबंध होता, याचीही चौकशी केली जात आहे. या वर्षात आतापर्यंत 79 किलो अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत, असेही प्रतिपादन बूरा यांनी केले. सीमेवरील कुंपणाखालून प्लॅस्टिक पाईपचा उपयोग करुन अंमली पदार्थ भारतात घुसविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सीमेवरील कुंपणावर लक्ष ठेवले जात आहे. यासाठी विविध अत्याधुनिक उपकरणांचे साहाय्य घेतले जात आहे, अशी माहिती देण्यात आली.