एसपी सिंह बघेल देणार करहलमध्ये आव्हान
भाजपने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या विरोधात करहल मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि आगराचे खासदार एसपी सिंह बघेल यांना उमेदवारी दिली आहे. देशाचे माजी संरक्षणमंत्री राहिलेले मुलायम सिंह यादव यांच्या सुरक्षेत बघेल हे एकेकाळी तैनात होते. तर अखिलेश यांनी सोमवारी करहलमध्ये स्वतःचा उमेदवारी अर्ज भरला आहे.
भाजपने केले चकित
अलिकडेच पक्षात सामील झालेल्या अपर्णा यादव यांना अखिलेश यांच्या विरोधात उमेदवारी देण्याचे संकेत मिळत होते. परंतु बघेल यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काँग्रेसने या मतदारसंघात ज्ञानवती यादव तर बसपने कुलदीप नारायण यांना उमेदवारी दिली आहे.
अखिलेश यांनी दिले आव्हान
करहलमध्ये भाजपच्या उमेदवाराला पराभव चाखावा लागणार असल्याचे अखिलेश यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हटले आहे. अशा स्थितीत भाजपकडून मागासवर्गीय नेत्याला उमेदवारी देण्यात आल्याने सप अध्यक्षांसमोर देखील आव्हान उभे राहू शकते. एसपी सिंह बघेल हे नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय कायदा राज्यमंत्री आहेत.
जातीय समीकरण
करहल मतदारसंघात सुमारे 3 लाख 71 हजार मतदार आहेत. यात यादव मतदारांची संख्या सुमारे 1 लाख 44 हजार इतकी आहे. म्हणजेच एकूण मतदारांमध्ये 38 टक्के मतदार हे यादव समुदायाचे आहेत. संबंधित जिल्हय़ातील 5 पैकी 4 मतदारसंघ मागील निवडणुकीत समाजवादी पक्षाने जिंकले होते. मैनपुरी, करहल अणि किशनी मतदारसंघांमध्ये यादव मतदारांचे प्रमाण अधिक आहे. तर ठाकूर समुदाय दुसऱया क्रमांकावर आहे. भोगांव मतदारसंघात लोधी समुदायाचे प्रमाण अधिक आहे. तर तेथे यादव मतदारांची हिस्सेदारी दुसऱया क्रमांकाची आहे.
मतदारसंघाचा इतिहास
करहल मतदारसंघ 1956 मध्ये पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आला. 1957 मध्ये पैलवान नत्थू सिंह यादव हे प्रजा समाजवादी पक्षातर्फे पहिले आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर तीनेवळ स्वतंत्र पक्षाचा उमेदवार जिंकला. पुढील निवडणुकीत भारतीय क्रांती दल आणि जनता पक्षाच्या तिकीटावर नत्थू सिंह निवडून आले. काँग्रेसच्या तिकीटावर 1980 मध्ये पहिल्यांदा शिवमंगल सिंह विजयी झाले. 1980 मध्ये पराभूत होणारे बाबूराम सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले. 1985 मध्ये लोकदलाच्या तिकीटवर तर त्यानंतर अनुक्रमे दोनवेळा जनता पक्ष आणि दोनवेळा सपच्या तिकीटावर ते विजयी झाले होते. 2002 साली भाजपचे सोबरन सिंह विजयी झाले, परंतु काही दिवसातच त्यांनी सपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या तिन्ही निवडणुकीत सप उमेदवारच जिंकत आला आहे.