वार्ताहर / किणये
कणबर्गी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. गेल्या नऊ दिवसांपासून नळाला पाणी आले नसल्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. या पाणीसमस्येबाबत ‘तरुण भारत’ मधून वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन पाणीपुरवठा मंडळाने गावात सुरळीत पाणीपुरवठा सुरू केला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
गावात पिण्यासाठी पाणीच नव्हते. यामुळे शेतशिवारातील खासगी विहिरी, कूपनलिका आदींचा आधार घ्यावा लागत होता. काहीजण टँकरनेही पाणी विकत घेत होते. गावात सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती.
गावात असलेल्या सार्वजनिक नळांना पाणी येत नव्हते. तसेच गावातील 20 ते 25 कूपनलिकाही बंद आहेत. गावाला हिडकल डॅमचे पाणी बसवनकोळ्ळ डोंगरामधील टाकीमध्ये सोडण्यात येते. या ठिकाणी पाणी फिल्टर करून ज्योतिर्लिंग गल्लीच्या कोपऱयावर असलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी सोडून ते पाणी गावाला पुरविण्यात येते. मात्र, हा पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती.
माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत माहिती दिली होती व पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा महिलांना घेऊन घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. यामुळे पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी गावातील पाणीपुरवठा सुरळीत केला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून नळाला पाणीच आले नव्हते. गुरुवारी मात्र प्रत्येकाच्या घरासमोर असलेल्या नळाला पाणी आले असल्यामुळे महिलावर्गातून समाधान व्यक्त होत आहे.