चिपळूण/प्रतिनिधी
रत्नागिरी कोर्टाने अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर राणे यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता परंतु योग्य ती प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे हायकोर्टने सुनावणीस नकार दिला. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतले असून त्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिक येथे दाखल झालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. नाशिक प्रमाणेच पुणे, महाड, चिपळूण पोलिसांत देखील राणेंविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
तांत्रिकदृष्ट्या एका केंद्रीय मंत्र्याला राज्य पोलीस सहजपणे अटक करु शकत नाही अशी चर्चा सर्वत्र चालू असतानाच मागील तीन तासांत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राणेंची यात्रा संगमेश्वर गोळवली येथे अडवून सर्वप्रथम रत्नागिरी पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीस नकार दिल्यानंतर राणेंच्या अटकेवर शिक्कामोर्तब झालं. या सर्व नाट्यमय घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त खळबळ उडाली आहे. राणेंच्या या अटकेने एका बाजूला सेनेचे कार्यकर्ते जल्लोष करत असून दुसऱ्या बाजूला भाजप कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा पसरला आहे .