जलसंपदाचे मुख्य अभियंता विजय गोगरे यांच्या पत्रानंतर पेढे वाटून आनंदोत्सव
प्रतिनिधी/ चिपळूण
वाशिष्ठीसह उपनद्यातील गाळ उपसासाठी गेल्या 29 दिवसांपासून बचाव समितीच्या माध्यमातून सुरू असलेले चिपळूणवासियांचे उपोषण सोमवारी सायंकाळी स्थगित करण्यात आले. बारापैकी आठ मागण्या मान्य करण्याबाबतचे पत्र जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी दिल्यानंतर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
पावसाळय़ापूर्वी गाळ काढण्याबरोबरच स्वयंचलीत पर्जन्यमापक यंत्रणा, गाळ उपसा मोहिमेसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त तसेच फुकटमध्ये गाळ काढण्याचे परिपत्रक आठवडाभरात निघणार असल्याचे सांगत घोगरे यांनी पूररेषेतील जुन्या बांधकामांच्या देखभाल दुरूस्तीला कोणतीही अडचण येणार नसल्याचे जाहीर केले.
महापुरात शहर परिसर उद्ध्वस्त झाल्यानंतर नद्यातील गाळाचा प्रश्न प्रामुख्याने पुढे आला. मात्र शासनस्तरावरून फारशी कार्यवाही होत नसल्याने अखेर चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून जनतेने साखळी उपोषणाचे रणशिंग 6 नोव्हेंबरपासून प्रांत कार्यालयासमोर फुंकले. उपोषणदरम्यान मंत्रालय, स्थानिक पातळीवर बैठका झाल्या. त्यामध्ये काही निर्णय झाले. निधीही मंजूर झाला. मात्र जोपर्यंत प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय समितीने घेतला. याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदाचे मुख्य अभियंता घोगरे यांची नियुक्ती चिपळूणच्या गाळासंदर्भातील मोहिमेसाठी केली. त्यांनी गेल्या 15 दिवसांत राज्यभरातील जलसंपदाची यंत्रसामुग्री येथे पाठवत गाळ उपसा मोहिमेला गती दिली.
दरम्यान, गाळ उपसाला मिळालेली गती शिवाय बहुतांशी मागण्या मान्य झाल्याने समितीने रविवारच्या पत्रकार परिषदेत उपोषण स्थगितीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार मुख्य अभियंता घोगरे यांच्यासह कार्यकारी अभियंता जगदिश पाटील, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी घोगरे यांनी सांगितले की, चिपळूणकरांनी गाळाचा प्रश्न दीर्घकाळ लावून धरल्यानेच गंभीर दखल घेत शासकीय यंत्रणा कामाला लागली. 9 कोटी 62 लाखाचा निधीही उपलब्ध झाल्याने त्यांचीही चिंता राहिलेली नाही. गाळ काढल्यानंतर त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे सांगितले.
गाळ उपसा करताना यंत्रणेला अडचणी येतील असे काही न करता एकजुटीने सहकार्यातून विधायक सल्ला द्या, रॉयल्टी न आकारता गाळ काढण्यासंदर्भातील शासन परिपत्रक आठवडाभरात येईल. लाल-निळय़ा पूररेषेत असलेल्या जुन्या बांधकामाना देखभाल दुरूस्तीसाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्वयंचलिन पर्जन्यमापन यंत्रणा पावसाळय़ापूर्वी बसवण्याबाबत कार्यवाही केली जाईल. एकूण या सर्व मोहिमेसाठी स्वतंत्र खास अधिकाऱयाची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूणच बहुतांशी मागण्या शासनस्तरावरून मान्य करण्यात आल्या असल्याने उपोषण मागे घेण्यात यावे, अशी विनंती घोगरे यांनी समितीला केली.
पेढे वाटून आनंदोत्सव
मुख्य अभियंता घोगरे यांनी दिलेले पत्र, केलेले आवाहन आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार केलेल्या कार्यवाहीचे आम्ही कौतुक करत आहोत. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देत आम्ही आमचे उपोषण स्थगित करत असल्याचे समितीचे अरूण भोजने यांनी सांगितले. त्यानंतर टाळय़ांच्या कडकडाटात आणि पेढे वाटून उपस्थितांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी समितीचे बापू काणे, सतीश कदम, शिरीष काटकर, किशोर रेडीज, शहानवाज शहा, महेंद्र कासेकर यांच्यासह कॉंग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्यासह येथील नगरसेवक, महिलावर्ग, व्यापारी उपस्थित होते.
तूर्तास उपोषण यशस्वी
गाळाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले आहेत. मात्र यामध्ये आमदार शेखर निकम यांचे सर्वात मोठे योगदान राहिले आहे. मंत्रालय स्तरावरील बैठका, निधीची तरतूद, यंत्रसामुग्रीसाठी पाठपुरावा, अधिकाऱयांशी सततचा संपर्क आणि त्यांना 29 दिवस साखळी उपोषण करून चिपळूणकरांनी दिलेली जोड यामुळे गाळाची दखल घेणे शासनाला भाग पडले आणि त्यातूनच राज्यभरातील यंत्रणा वाशिष्ठीत धावली. तूर्तास चिपळूणकरांचे उपोषण यशस्वी झाले.