वाई / प्रतिनिधी :
वाई येथील कृष्णा नदीवरील 137 वर्षाचा ब्रिटिशकालीन पूल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पाडण्यात आला. रात्री 1 वाजताच हा पूल पाडण्याचे काम हाती घेतल्याने वाईकरांनी पुलाच्या शेवटच्या आठवणी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात, डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, वाईकरांनी हा पूल वाचवण्यासाठी उभी केलेली लोक चळवळ व्यर्थ गेल्याचे दिसून आले.
वाई शहरातील ब्रिटिशांनी 137 वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार असल्याने तो जुना पूल ऐतिहासिक ठेवा म्हणून जतन करावा, यासाठी वाईमधील काही मंडळींनी लोकचळवळ उभी केली होती. त्यामध्ये रशिया येथे स्थित असलेल्या ज्योती चव्हाण, दिग्दर्शक निर्माते तेजपाल वाघ यांनी सोशल मीडियावर पूल वाचवण्यासाठी आवाहन केले होते. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत रांजणे यांनी तर पुलावर कविता लिहली आहे. काँग्रेसचे वाई तालुकाध्यक्ष रविंद्र भिलारे, भाजपचे शहराध्यक्ष राकेश फुले यांनी निवेदन देऊन पूल पाडू नका, अशी मागणी केली होती. शेवटच्या पुलाच्या आठवणी म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने वाईकरांनी पुलासोबतचे दीपोत्सवाचे फोटो काढण्यात आले. पूल पाडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी होऊ लागली होती. अखेर 137 वर्षाचा पूल पाडण्यात आल्याने वाईकरांकडे केवळ आठवणी उरल्या आहेत.