प्रतिनिधी /बेळगाव
राणी कित्तूर चन्नम्मा चौक ते आरटीओ सर्कल या मार्गावर मोठी वर्दळ असते. नुकतेच या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालयासमोर गतिरोधक बसवावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार गुरुवारी या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
कित्तूर चन्नम्मा चौक ते आरटीओ या रस्त्याचे काँक्रिटीकरण काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. या रस्त्यावरच जिल्हाधिकारी कार्यालय तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला न्यायालये आहेत. मुख्य जिल्हासत्र न्यायालयाकडून जेएमएफसी न्यायालयाकडे वकिलांना आणि पक्षकारांना ये-जा करावी लागते. मात्र वाहतुकीची वर्दळ मोठी असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वकील, पक्षकार आणि इतर वाहनांना ताटकळत थांबावे लागत होते. या ठिकाणी यापूर्वी लहान-मोठे अपघातही घडले आहेत.
या रस्त्यावरून वाहने वेगाने चालविली जातात. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसवावे, अशी मागणी वकिलांसह इतरांनी केली होती. त्याची दखल स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी घेऊन गतिरोधक बसविले आहेत. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.