आयसीसीचे बीसीसीआयला स्पष्ट संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा भारतात भरवणे शक्य नसून ती संयुक्त अरब अमिरात व ओमानमध्ये हलवली जाईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. आयसीसीने बीसीसीआयला याबद्दल प्रथमदर्शनी संकेत दिल्याचे वृत्त आहे. संयुक्त अरब अमिरातीचा पर्याय यापूर्वी देखील होता. त्यात आता ओमानची राजधानी मस्कतचा समावेश केला गेला. अबुधाबी, दुबई, शारजाह व मस्कत या 4 ठिकाणी स्पर्धेतील सामने खेळवले जाणार आहेत. ऑक्टोबरमधील शेवटच्या आठवडय़ात या स्पर्धेला सुरुवात होणे अपेक्षित आहे.
‘बीसीसीआयने आयसीसीकडून 4 आठवडय़ांची मुदत मागून घेतली असली तरी नियामक मंडळाने ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरात व ओमानमध्ये हलवल्यास आपली त्याला काही हरकत नसेल, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे’, असे एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.
संयुक्त अरब अमिरातीमध्येच आयपीएलचे 31 सामने देखील होणार आहेत. त्यामुळे, खेळपट्टय़ा सुसज्ज ठेवण्यासाठी अवधी मिळावा, यासाठी मस्कतमध्ये विश्वचषकातील काही सामने भरवले जाणार आहेत. आयपीएल स्पर्धा दि. 10 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होऊ शकली तर ग्राऊंड स्टाफला काहीसा वेळ मिळेल. मात्र, असे होऊ शकले नाही तर विश्वचषकातील पहिल्या आठवडय़ाचे सामने मस्कतमध्ये घेण्याचे आयोजकांचे नियोजन आहे.
‘आयसीसीने 28 जूनपर्यंतची मुदत बीसीसीआयला दिली आहे. पण, 28 जून रोजी बीसीसीआय कोणत्याच परिस्थितीत ऑक्टोबरमधील स्थिती काय असेल, याचा काहीच अंदाज वर्तवू शकणार नाही. बीसीसीआय सप्टेंबरमध्ये भारतात आयपीएल भरवू शकत नसेल तर ती ऑक्टोबरमध्ये टी-20 वर्ल्डकप कशी घेऊ शकेल, हे सांगणेही कठीण आहे’, असे सूत्राने पुढे नमूद केले.