प्रतिनिधी/बेळगाव :
परप्रांतियांना स्वगृही पाठविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. महापालिकेचे आणि कामगार खात्याचे अधिकारी याकरिता विशेष कार्यरत आहेत. प. बंगालच्या नागरिकांना जाण्यासाठी रेल्वे किंवा बसची सुविधा नसल्याने प. बंगालमधून आलेल्या विशेष बसने 31 कामगारांना गुरुवारी रात्री स्वगृही पाठविण्यात आले.
लॉकडाऊनमुळे नागरिकांचा रोजगार बुडाला आहे. पोटापाण्याची व्यवस्था होणे कठीण बनले असल्याने परप्रांतीय कामगार आपल्या घरी जाण्यासाठी धडपड करीत आहेत. मनपा आणि कामगार खात्याच्यावतीने हजारो परप्रांतीय कामगारांना घरी पाठविले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि झारखंड आदी ठिकाणी रेल्वे आणि बसने नागरिकांना पाठविण्यात आले. पण प. बंगालला जाण्यासाठी रेल्वे किंवा बसची सुविधा नसल्याने या कामगारांना थांबण्याची सूचना करण्यात आली होती. पण राहण्यासाठी घर नाही, जेवण नाही तसेच हातात पैसा देखील नाही, त्यामुळे रहायचे कसे? असा प्रश्न कामगारांसमोर निर्माण झाला होता. त्यामुळे घरी पाठविण्याची व्यवस्था करा, अशी मागणी कामगारांनी केली होती. त्यामुळे बेळगाव जिल्हा प्रशासनाने प. बंगाल सरकारशी चर्चा करून कामगारांना पाठविण्यासाठी बसची व्यवस्था करण्याची सूचना केली होती. प. बंगाल सरकारने बस पाठविण्याची मान्य केले होते. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी प. बंगालहून विशेष बस बेळगावात दाखल झाली. त्यानंतर त्या बसने 31 कामगार गावाकडे रवाना झाले आहेत. नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले महापालिकेचे महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर यांनी कामगारांना पाठविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. गुरुवारी सायंकाळी 31 कामगारांची आरोग्य तपासणी केल्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करून पाठविण्यात आले.