प्रतिनिधी / सातारा :
किल्ले अजिंक्यतारा आणि यवतेश्वरच्या पायथ्याला अनेक घरे आणि झोपड्या वसलेल्या आहेत. तसेच अलिकडच्या काही वर्षांमध्ये शासकीय जागेत वसवलेली पॉवर हॉऊस झोपडपट्टी तसेच डोंगरालगत सुरू असलेले इमारतींचे बांधकाम यामुळे माळीण, तळीयेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भिती तज्ञांनी व्यक्त केली आहे. नगरसेवक अमोल मोहिते यांनी माची पेठेतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दीड किलोमीटर संरक्षक भिंतीची मागणी केली होती. तो प्रस्ताव शासनाच्या लालफितीत अडकला आहे.
ज्या जागेत ही झोपडपट्टी वसवली गेली ती जागा गायरानाची असून, चार वर्षापूर्वी प्रांताधिकाऱ्यांनी ते अतिक्रमण हटवण्याचे पाऊल उचलले होते. आता 2014 मध्ये घडलेल्या माळीण, रायगड जिल्ह्यातील तळीये, पाटण तालुक्यातील आंबेकर या गावांप्रमाणेच या पॉवर हॉऊस झोपडपट्टीची अवस्था कालातंराने होईल, अशी भीती साताऱ्यातील तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्या झोपडपट्टीत दाटीवाटीने 500 हून अधिक झोपड्या आहेत. त्यामुळे पुन्हा पॉवर हॉऊसचा झोपडपट्टीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
नगरसेवक अमोल मोहिते यांनी मांडला होता संरक्षक भिंतीचा प्रस्ताव
साताऱ्यातील माची पेठेपासून ते बोगद्यापर्यंत ज्या डोंगरी भागात घरे आहेत. त्या लोकांच्या सुरक्षितेतेसाठी डोंगरी विकास निधीतून 20 कोटी रुपयांच्या निधी खर्चून सुमारे दीड किलोमीटर लांबीची डोंगराच्या बाजुने भिंती उभारण्यात यावी, अशी मागणी केली होती. तसा प्रस्तावही पालिकेकडून नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आल्याचे समजते. मात्र, शासकीय काम अन् 6 महिने थांब या उक्तीप्रमाणे हा प्रस्ताव मध्येच थांबला आहे.