प्रतिनिधी / बेळगाव :
बाजारपेठेत अतिक्रमण वाढत चालल्याने वाहनधारक आणि पादचाऱयांना रस्ता मिळणे मुश्किल झाले आहे. यामुळे महापालिकेच्यावतीने गुरूवारी गणपत गल्ली आणि मारूती गल्लीतील जम्प्स् आणि अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईवेळी मारूती गल्लीतील व्यवसायिकांने अतिक्रमण हटविणाऱया मनपाच्या कामगारावर हात उगारला. यामुळे कारवाईला वादाचे ग्रहण लागले.
बाजारपेठेत फेरीवाल्याचे अतिक्रमण वाढले आहे, प्रत्येक रस्त्यावर दोन्ही बाजूने भाजी विपेते आणि फेरीवाले ठाण मांडत आहेत. परिणामी रस्ता अपुरा पडू लागला आहे. फेरीवाल्याच्या अतिक्रमणाला कंटाळून काही व्यवसायिकांनी गटारीवर आपले साहित्य ठेवण्यास प्रारंभ केला आहे. तर काही व्यवसायिकांनी जम्प्स् घालून फेरीवाल्यांना भाडेतत्वावर दिले आहे. त्यामुळे बाजारपेठेत अतिक्रमणाचा विळखा वाढत चालला आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रारी वाढल्याने रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहिम गुरूवारी राबविण्यात आली. गणपत गल्ली, मारूती गल्ली अशा विविध परिसरातील दुकानासमोरील अतिक्रमणे हटविण्यात आली. काही व्यवसायिक आणि फेरीवाल्यानी मार्किगच्या बाहेर ठाण मांडल्याचे निदर्शनास आल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यावेळी दुकानासमोरील जम्प्स् हटविण्याची कारवाई राबविण्यात आली.
गणपत गल्लीत ही कारवाई राबविण्यात आल्यानंतर मारूती गल्लीतील अतिक्रमणे हटविली. मारूती मंदिर जवळील अतिक्रमणे हटविताना एका व्यवसायिकाने कारवाईला आक्षेप घेवून विरोध दर्शविला. तसेच मनपाच्या कर्मचाऱयावर हात उगारला. त्यामुळे व्यावसायिक आणि मनपाच्या कर्मचाऱयांमध्ये जोरदार वादावादी झाली. वादावादीमुळे कारवाईत अडथळा झाला. मात्र हा वाद पोलीस स्थानकापर्यत पोहचला. त्याठिकाणी तोंडी तक्रार करण्यात आली.
मोकाट जनावरे पकडण्यास गेलेल्या कर्मचाऱयावर हल्ला झाल्याची घटना मागील आठवडय़ात घडली होती. त्यापाठोपाठ अतिक्रमणे हटविणाऱया अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱयावर हात उगारण्याचा प्रकार घडल्याने मनपाच्या कारवाईला जनसामान्यांमधून रोष वाढत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.