कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची माहिती : दहा महिन्यात प्रकल्प पूर्णत्वास,मुंबई आयआयटीच्या देखरेखीखाली होणार काम
प्रतिनिधी / पणजी
कला अकादमी प्रकल्पाचे हाती घेतलेले दुरुस्तीकाम सध्या युद्धपातळीवर सुरू असून पुढील 20 ते 25 दिवसात पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात स्लॅब दुरुस्तीवर भर देण्यात आला आहे. बांधकाम क्षेत्रातील सध्याचे सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात येईल. त्यामुळे भविष्यात कुठेही गळती किंवा पाणी पाझरणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. पुढील 10 महिन्यात हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, अशी माहिती कला संस्कृती मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी दिली.
सध्या चालू असलेल्या दुरुस्तीकामाची पत्रकारांना माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. कला अकादमीत वरून गळती आणि खालुन पाणी पाझरत होते. दिनानाथ मंगेशकर कला मंदिरसह ब्लॅक बॉक्समध्येही पाणी पाझरत होते. आता हाती घेतलेल्या दुरुस्तीत अत्याधुनिक तंत्रग्नज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्व त्रुटी संपणार असून कुठेही गळती किंवा पाणी पाझरण्याचे प्रकार घडणार नाहीत, असे गावडे यांनी सांगितले.
ओपन एअर ऑडिटोरीयमला पूर्णतः नवीन झळाळी प्राप्त होणार आहे. मदर स्लॅब ज्याला ऑरिजिनल स्लॅबही म्हटले जाते, त्याचे सर्फेस प्रिपरेशन करण्यात येणार आहे. त्यानंतर विशेष केमिकल ट्रिटमेंट देऊन क्रॅक फिलिंग करण्यात येईल. त्यापुढी चौथी प्रक्रिया म्हणजे स्टिचिंग. त्यात पाण्यापेक्षा पातळ पदार्थाद्वारे बारीकातील बारीक छिद्र सुद्धा भरण्यात येणार आहे. त्यानंतर मायक्रो काँक्रीट किंवा थिरोड्रॉपिक मोर्टार वापरून सर्व थर भरून काढण्यात येतील. त्यापुढे रिपस्टार, स्मार्टसिल 104 आणि स्मार्टसिल 450 अशा त्रीस्तरीय केमिकल ट्रिटमेंटद्वारे वॉटरप्रुफिंग करण्यात येईल. त्याचबरोबर जीओ मेंब्रेनचा थर देण्यात येईल. सर्वात शेवटी कोबा वॉटरलेयर आणि चायना चिप्स किंवा पीव्ही कोटिंग बसविण्यात येतील. अशाप्रकारे स्लॅब संरक्षित करण्यात येणार आहे, अशी माहिती गावडे यांनी दिली.
हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्लॅब सुस्थितीत आणल्यानंतर खांबांना बळकटी देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. कोणताही खांब न पाडता त्यांना बाहेरून बळकटी देण्यात येणार आहे. त्यामुळे खांबांचा आकार काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान हे काम करणारा कंत्राटदार, सल्लागार किंवा पीडब्ल्यूडीतील अभियंते यांच्या मान्यतेवरच अवलंबून न राहता या कामावर अंतिम देखरेख ठेवण्यासाठी थर्ड पार्टी कन्सल्टंट म्हणून मुंबई आयआयटीतील तज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. डॉ. आर. जंगीर यांच्या नेतृत्वाखाली तज्ञांची टीम हे काम मॉनिटर करणार आहे. कंत्राटदाराने या कामाची सुमारे 25 वर्षांची हमी दिली आहे, अशी माहिती मंत्री गावडे यांनी दिली.