उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा सवाल : जिल्हा विभाजनला बसला खो
वार्ताहर/ अथणी
बेळगाव जिल्हय़ाचे विभाजन करुन चिकोडी व गोकाक या नवीन जिल्हा निर्मितीची मागणी होत आहे. मात्र असे असले तरी अथणी देखील जिल्हा का होऊ शकत नाही? त्यामुळे याबाबत अद्याप जिल्हा निर्मिती विभाजनाबाबत निर्णय झालेला नाही, असे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्हा विभाजनाच्या मागणीला एकप्रकारे खो बसल्याचे बोलले जात आहे.
अथणी येथे नगरपालिकेच्या गाळा इमारत व राज्य परिवहन मंडळाच्या संकुल उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, बेळगाव जिल्हय़ाचे विभाजन करुन चिकोडी व गोकाक जिल्हय़ाची मागणी जोर धरत असली तरी अथणी देखील जिल्हा का होऊ शकत नाही? बेळगाव जिल्हा विभाजन करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे यासाठी विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार महेश कुमठहळ्ळी, ता. पं. अध्यक्षा भारती गुरुबसू मुगन्नावर, जि. पं. सदस्य एस. ए. मुदकन्नावर आदी उपस्थित होते.