मनोज पवार / दापोली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन झाल्यानंतर अरबी समुद्रातील सर्व मासेमारी नौका विविध खाडय़ांमध्ये नांगर टाकून विसावल्या आहेत. संचारबंदीमुळे या बोटींवरील खलाशी अत्यावश्यक कामासाठी ना जमिनीवर उतरू शकत नाहीत ना बोटींचे मालक बोटींपर्यंत पोहोचू शकत. याबाबत कोणत्याच यंत्रणेकडून लक्ष दिले जात नसल्याने अशा बोटींवरील हजारो खलाशांचा प्रश्न गंभीर बनला आहे. ‘पसरले चहूकडे पाणी पिण्याला थेंबही नाही’ या काव्यपंक्तींचा प्रत्यय या खलाशांना सध्या येतोय. अथांग समुद्रात अडकून पडलेल्या या खलाशांना एक घोट पाण्यासाठीही किनाऱयाकडे आस लावून बसावे लागतेय…!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने अरबी समुद्रात असणाऱया सर्व बोटी कोकणातील विविध खाडय़ांमध्ये सुरक्षित स्थानी विसावल्या आहेत. या नौका विविध खाडय़ांमध्ये बंद अवस्थेत असल्या तरी त्यावर मासे पकडायच्या जाळ्य़ा, ऑईलचे डबे, डिझेलचे कॅन तसेच मच्छीमारीची अन्य महागडी साधनेही आहेत. या बोटींची किंमतही काही लाखांच्या घरात असते. या बोटींवर असलेल्या इंजिनची दैनंदिन देखभाल करणे गरजेचे असते. यामुळे नौका मालकांना प्रत्येक नौकेवर 2 ते 3 खलाशी 24 तास भरपगारी कामावर ठेवावे लागतात. अशा हजारो बोटी कोकणातील विविध खाडय़ांमध्ये विसावलेल्या आहेत.
केवळ दापोली तालुक्यात सर्व नौकांवर मिळून सुमारे दीड हजारच्या आसपास खलाशी आजही कार्यरत आहेत. सुरुवातीला परिस्थिती एवढी गंभीर होईल, असे बोटीच्या मालकांना वाटले नव्हते. यामुळे या बोटीवर राहणाऱया खलाशांसाठी जास्त खाद्य व सामान बोटींवर साठवून ठेवलेले नव्हते. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाल्याने सध्या परिसरातील सर्व हॉटेल्स व टपऱया बंद आहेत. यामुळे या खलाशांना दैनंदिन गरजेच्या वस्तूही मिळत नाहीत. या खलाशांना साधा वडापाव, चहा किंवा साबण, तेल सारख्या वस्तूही उपलब्ध नाहीत. यामुळे या खलाशांचे मोठय़ा प्रमाणावर हाल होत आहेत.
या खलाशांपर्यंत घरातून नेऊन जेवण, चहा, नाश्ता पोचवायचे म्हटले तरी बोटीच्या मालकांना दिवसातून किमान चारवेळा घरातून बाहेर पडावे लागते. संचारबंदी असल्याने पोलीस त्यांना गावाच्या बाहेर जाऊ देत नाहीत. बोटीवरील खलाशांचे मोबाईल रिचार्जही संपलेले असल्याने ते बोट मालकाशी संपर्कही साधू शकत नाहीत. या खलाशांना रोज पिण्यासाठी पाणी मिळणेदेखील कठीण झाले आहे.
या सर्वांची शासनाने त्वरित दखल घ्यावी व या खलाशांना रोजचे पाणी, जेवण, नाश्ता उपलब्ध होण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा, अशी मागणी दापोली, मंडणगड व गुहागर मच्छीमार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण पावसे यांनी संघटनेच्या वतीने शासनाकडे केली आहे. यावर शासन कोणती भूमिका घेते, याकडे कोकणातील सर्व मासेमार बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.