आतापर्यंत 80 टक्के घरपट्टी जमा : कर्मचाऱयांच्या कार्यालयअंतर्गत बदल्यामुळे महसूल वसुलीच्या कामात अडथळा
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेकडून मार्च महिन्यात घरपट्टी वसुलीची मोहीम राबविण्यात येते. मात्र महसूल उपायुक्तपदाच्या वादामुळे महसूल वसुलीची मोहीम ठप्प झाली आहे. आतापर्यंत 80 टक्के घरपट्टी जमा झाली आहे. उर्वरित घरपट्टी जमा करण्यासह नव्या इमारतींना घरपट्टी बसवून महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आदेश आयुक्तांनी बजावला आहे. पण महसूल वसुली ठप्प झाल्याने उद्दिष्ट पूर्ण होणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
दरवषी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शहरातील मालमत्ताधारकांकडून घरपट्टी वसूल करण्याची मोहीम राबविण्यात येते. पण यंदा मनपा उपायुक्तपदाचा वाद संपता संपेनासा झाल्याने मनपा कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे. महसूल उपायुक्तपदाच्या वादामुळे विशेषतः महसूल विभागातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून असंख्य नागरिकांच्या फाईल्स रखडल्या आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात 50 कोटी रुपये घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत केवळ 40 कोटी घरपट्टी जमा झाली असल्याने 80 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
मार्चअखेरपर्यंत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल निरीक्षकांना महापालिका आयुक्तांनी सूचना केल्या आहेत. तसेच शहर आणि उपनगरात नव्याने निर्माण झालेल्या मालमत्तांना कर बसवून घरपट्टी जमा करण्याची सूचना केली होती. महापालिका व्याप्तीमध्ये 30 हजाराहून अधिक मालमत्ताधारकांनी घरपट्टी बसवून घेतली नसल्याचा दावा महापालिका आयुक्त रूद्रेश घाळी यांनी केला होता. तसेच मार्चअखेरपर्यंत जास्तीतजास्त घरपट्टी जमा करण्याची सूचना केली होती. पण महसूल उपायुक्तपदाच्या वादामुळे घरपट्टी वसुली मोहीम ठप्प झाली आहे. तसेच महसूल विभागातील कर्मचाऱयांना पदवीधर मतदारांची यादी तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे घरपट्टी वसुलीची मोहीम थंडावली आहे.
घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होणार का?
अशातच मनपाच्या 40 हून अधिक कर्मचाऱयांच्या कार्यालयअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महसूल वसुलीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. आता निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.