पसार्डे येथे माती आणि पाणी परिक्षण विभागाचा शुभारंभ
सांगरूळ / वार्ताहर
कृषिप्रधान भारत देशातील तरुण पिढी शेतीपासून आलिप्त होत आहे. तरुण पिढीने शेती व्यवसायाकडे बघताना व्यवसाय म्हणून पहावे. नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती केल्यास या व्यवसायामध्ये नक्कीच फायदा आहे असं प्रतिपादन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. पासार्डे (ता. करवीर) येथे आयोजित मंगेश ॲग्रो युनिटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड पासार्डे या कंपनीच्या माती आणि पाणी परिक्षण विभाग शुभारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी बोलताना चंद्रदीप नरके म्हणाले माणिक नाळे यांच्यासारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणानं अल्पावधीत कृषी क्षेत्रात कौतुकास्पद काम केलं आहे . शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून कमी क्षेत्रात जास्त उत्पादन कसं मिळू शकते याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू केलं आहे. आपल्या जिल्ह्यात ऊस शेतीचे मोठे उत्पादन घेतलं जातय.पण तोडणी यंत्रणेचा मोठा अभाव जाणवत असून जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने तोडणी यंत्रणेमुळं अडचणीत आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीबरोबर तोडणी यंत्रणेचा ही विचार करणे प्रामुख्यानं गरजेचं असल्याचं सांगितले.
यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य पुंडलिक पाटील यांनी आपल्या स्वतःच्या चार एकर शेतीमध्ये माणिक नाळे यांच्या मार्गदर्शनानुसार शेती केली असून पूर्वीपेक्षा नक्कीच उत्पादन वाढ झालेली दिसत आहे स्वतः माती परीक्षण करून पिकासाठी नेमके कोणते घटक लागतात याची उत्तम प्रकारे माहिती माणिक नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळते. त्यामुळे तरुणांनी शेती व्यवसाय कडे येताना योग्य मार्गदर्शन घेऊन शेती केल्यास शेतीपासून अधिक नफा मिळू शकतो असे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक करताना मंगेश ॲग्रो युनिटेक इंडस्ट्रीजचे सी एम.डी माणिक नाळे यांनी शेतकऱ्यांनी हळूहळू रासायनिक खतांना बगल देत सेंद्रिय शेती करून आपल्या जमिनीचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. यावेळी मंगेश ॲग्रो युनिटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड पासार्डे या कंपनीच्या माती आणि पाणी परिक्षण विभागाचा शुभारंभ माजी आमदार चंद्रदीप नरके याच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्रगतशील आणि यशस्वी शेतकऱ्यांचा सत्कार कंपनीच्यावतीने करण्यात आला.
यावेळी कंपनीच्या डायरेक्टर रुपाली नाळे, कुंभीचे संचालक किशोर पाटील, मानिक नाळे, आनंदा नाळे, सरपंच वंदना चौगले, अनिता पाटील, कृष्णात चौगले,दत्तात्रय नाळे, संभाजी चौगले, विलास चौगले,के एस चौगले यांच्यासह शेतकरी आणि कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन पुनम चौगले यांनी केले .आभार फिल्ड ऑफिसर संभाजी भित्तम यांनी मानले