जयपूर / वृत्तसंस्था
राजस्थानमधील गेहलोत आणि पायलट यांच्यातील सत्तासंघर्ष आता राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री पातळीवर पोहोचल्याचे बुधवारी दिसून आले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा विशेष विधानसभा अधिवेशन बोलवण्याचा प्रस्ताव राज्यपाल कलराज मिश्रा यांनी तिसऱयांदा फेटाळून लावला आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या पवित्र्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रात्री पुन्हा मंत्रिमंडळ बैठक आमंत्रित केली होती. मात्र, या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती तातडीने उपलब्ध होऊ शकली नाही.
मुख्यमंत्र्यांनी बुधवारी राज्यपालांची भेट घेत पुन्हा एकदा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. त्यासंबंधीचा लेखी प्रस्तावही त्यांनी सादर केला. यावेळी द्वयींमध्ये जवळपास पंधरा मिनिटे चर्चाही झाली. मात्र, राज्यपालांनी अधिवेशनासाठी सकारात्मकता न दर्शवल्याने गेहलोत यांच्या पदरी निराशाच पडली. दरम्यान, बुधवारी विधानसभा सभापती सी. पी. जोशी यांनीही राज्यपालांची भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.