वार्ताहर/ अथणी
मुंबईमधून अनंतपूर आलेल्या 5 जणांच्या कुटुंबास कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. मुंबई येथून एकूण 7 व्यक्ती अनंतपूरला परतल्या होत्या. त्यांना येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. मुदत संपल्यानंतर या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले. यापैकी 44 वर्षांचा पुरुष, 35 वर्षांची महिला, 16 वर्षांचा मुलगा आणि 17 व 15 वर्षांच्या मुलींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. हे कुटुंब मूळचे शिंगणापूर (ता. जत) येथील आहे. अथणी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, अथणी शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे खबरदारी म्हणून आठ दिवस सर्व व्यवहार बंद राहणार असून फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यानुसार प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आमदार महेश कुमठहळ्ळी यांनी दिली.
शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत येथील व्यापारी संघाने बैठक घेऊन सर्व व्यवहार बंद राहणार असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. असे सांगून कोरोना नियंत्रणासाठी येते आठ दिवस शहर आणि तालुक्यातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. तसेच रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास आणखीन आठ दिवस व्यवहार बंद ठेवण्यात येतील, अशी माहितीही आमदार कुमठहळ्ळी यांनी दिली.
माहिती लपविल्यास गुन्हा दाखल करणार
शहर किंवा तालुक्यात कोणाचाही मृत्यू झाल्यास याची माहिती प्रशासनास देण्यात यावी. यामुळे खबरदारी घेता येईल. त्याचा मृत्यू नैसर्गिक आहे की कोरोनामुळे याची शहानिशा झाल्यास धोका टळेल, अशी माहिती कोणी लपविल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, कोरोना नियंत्रणासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार कुमठहळ्ळी यांनी दिली.