प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ मुख्य रस्त्यावर असलेल्या आशीर्वाद मंगल कार्यालयासमोरील पदपथावर अवजड वाहनाचे चाक गेल्याने ते अवजड वाहन अडकल्याची घटना घडली आहे. पदपथावर वाहनाचे चाक गेल्याने दर्जादेखील उघडकीस आला आहे. काँक्रीट फुटून ट्रक खालीच धसला आहे. बुधवारी घडलेल्या या घटनेमुळे या परिसरात स्मार्ट सिटीच्या कामांच्या दर्जाबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आशीर्वाद मंगल कार्यालयासमोरून नागरिकांना चालत जाण्यासाठी पदपथ बांधण्यात आले आहे. मृत्युंजयनगर, विद्यानगर, हाजुगेरी या ठिकाणी जाण्यासाठी नागरिक त्याचा वापर करतात. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंटच्या पाईप घालून अंतर्गत वीजवाहिन्या तसेच इतर केबल घालण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. मोठे चौकोनी खड्डे खोदून चेंबर तयार करण्यात आले आहेत. त्या चेंबरवर काँक्रीटचे झाकण घालण्यात आले होते. मात्र, बुधवारी त्यावर ट्रक चढताच झाकणाचा चक्काचूर झाला.
त्यामुळे या रस्त्याचा दर्जा उघडकीस येत आहे. मोठी कसरत करून हे वाहन कसेबसे बाहेर काढण्यात आले. अनेक ठिकाणी चेंबर काढून त्यावर झाकणे बसविली गेली आहेत. अशाप्रकारे काही दिवसांतच झाकणे फुटत असतील तर त्याचा काय उपयोग?, स्मार्ट सिटीच्या कामाचा दर्जा कुचकामी ठरू लागला आहे. अजून काम पूर्णही झाले नाही, तेवढय़ात अशा प्रकारे घटना घडत आहेत.
याबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच संबंधित खात्याने या रस्त्याचा आणि पदपथाचा दर्जा तपासावा तसेच संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.