सकाळपासून खरेदीला सातारकर नागरिक घराबाहेर
प्रतिनिधी/ सातारा
सोमवारी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सातारकर नागरिक सकाळपासून खरेदीला घराबाहेर पडले होते. पावसाने बराच वेळ उघडीप दिल्याने खरेदीचा जोर चांगलाच वाढला होता. तब्बल 62 दिवसांनी शहरात वाहतूक सुरू होती. किरकोळ विक्रेते ते व्यापारी यांच्यात समाधानाचे वातावरण होते.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्बंध शिथिल केले. सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूसह कापड दुकाने, सोने-चांदी दुकाने, पावसाळी साहित्य विक्रीची दुकाने, स्टेशनरीची दुकाने सूरू झाली. यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून सातारकर नागरिक खरेदीला गर्दी करू लागले. तब्बल 65 दिवसांनी शहरातील सर्वच बाजारपेठा गजबजल्या होत्या. शाळा, महाविद्यालये बंद असली तरी किरकोळ साहित्य स्टेशनरी दुकानातून खरेदी करण्यात येत होते. पावसाळा सुरू असल्याने रेनकोट, छत्री यांची मागणी वाढली आहे.
कापड दुकानात बस्त्यासाठी तसेच इतर कपडे खरेदीसाठी तोबा गर्दी झालेली पहावयास मिळत होती. त्याचबरोबर लग्नासाठी लागणारे दागिने खरेदीसाठी सोने चांदीच्या दुकानात अक्षरशः रांगा लागल्या होत्या. भाजी, फळे यांची विक्री तेजीत सुरू होती. दुपारी चार वाजेपर्यंत रस्त्यावर वाहनांसह पादचाऱयांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होती. त्यानंतर हळूहळू वर्दळ कमी झाली. सायंकाळी सहा नंतर शहरात पुन्हा शुकशुकाट पसरला होता. दिवसभर पोलिसांनी शहरात कडा पहारा ठेवला होता.