मुंबईसह महाराष्ट्रात जातो तांदूळ :
प्रतिनिधी/ बेळगाव
कोणावरही उपासमारीची वेळ येवू नये, या उद्देशाने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अन्नभाग्य ही योजना सुरू केली होती. 1 रुपये दराने प्रतिकिलो तांदूळ देऊन गरीब कुटुंबीयांना जगविण्याचे काम सरकारने हाती घेतले होते. या योजनेच्या तांदळाचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आले आहे. या काळय़ाबाजाराचे केंद्र हुबळीत असल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली बैलहोंगल पोलिसांनी गद्दीकरविनकोप्पजवळ ट्रक अडवून मोठय़ा प्रमाणात तांदूळसाठा जप्त केला आहे. या काळय़ाबाजाराचे केंद्र हुबळी असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून मंगळवारी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांच्या चौकशीत ही माहिती हाती आली आहे.
हुबळीत राजरोसपणे अन्नभाग्यच्या तांदळाचा काळाबाजार व साठेबाजी केली जात आहे. बेळगाव पोलिसांनी गेल्या आठ दिवसांत केलेली ही दुसरी कारवाई आहे. हुबळीत साठवलेले तांदूळ मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागात पाठविण्यात येत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. गेल्या आठवडाभरापूर्वी नंदगड पोलिसांनीही प्रत्येकी 50 किलोची 1200 तांदळाची पोती जप्त केली होती.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्नभाग्य योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या तांदळाचा काळाबाजार करून ते मुंबईला पाठविण्यात येत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अन्नभाग्य योजनेसाठी दरवषी सरकार हजारो रुपये खर्च करते. मात्र या तांदळाची काळाबाजारात विक्री होत असल्यामुळे सरकारी योजनेच्या मूळ उद्देशाला धक्का पोहोचत आहे.