गोडोली / प्रतिनिधी :
गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीने स्व:उत्पन्न, प्राप्त होणारे अनुदान, अन्य जमा रक्कम आणि वर्षभरात कराव्या लागणाऱ्या एकूण खर्चावर आधारित अंदाजित रक्कमेवर वार्षिक अंदाजपत्रक तयार करावे लागते. जमा आणि खर्चाचा ताळमेळ घालून हे अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य हे सरपंचाचे असून, त्यांनी दि.२८ फेब्रुवारीपूर्वी हे अंदाजपत्रक सादर केले पाहिजे. अन्यथा ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार कर्तव्यात कसूर केली म्हणून सरपंच अपात्र ठरु शकतात.
सरपंचांनी केलेल्या अंदाजपत्रकास ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी विचार विनिमय करून दि.७ मार्चपूर्वी मासिक सभेत मान्यता दिली पाहिजे. त्यानंतर सदर अंदाजपत्रकास दि.१५ मार्चपूर्वी ग्रामसभेत चर्चा करून प्राप्त सुचनांनुसार आवश्यक बदल करावा लागतो. त्यानंतर हे अंदाजपत्रक ग्रामसभेच्या निर्णयानंतर ते पंचायत समितीला सादर करावे लागते. पंचायत समिती कडून दि.३१ मार्च पूर्वी अंदाजपत्रकात तपासणी करून ते मंजुरी देऊन ग्रामपंचायतीस पाठवले जाते. या मंजूर अंदाजपत्रकानुसार दि.१ एप्रिल ते दि.३१ मार्च या आर्थिक वर्षात कामकाज करावे लागते.
सरपंचांनी अंदाजपत्रक न केल्यास, ग्रामपंचायत सभा, ग्रामसभेत मान्यता न मिळाल्यास ग्रामसेवकांनी कराव्या लागणाऱ्या अनिवार्य आणि कार्यालयीन खर्चाचे अंदाजपत्रक पंचायत समितीस सादर करावे लागते. अंदाजपत्रक तयार न केल्यास, सभांची मान्यता घेतली नाही तर ग्रामपंचायत अधिनियमानुसार कर्तव्यात कसूर केली म्हणून जबाबदारी निश्चित करून सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्या विरोधात कारवाई होऊ शकते. यात सरपंच, सदस्य दोषी असल्यास ते अपात्र ठरु शकतात.