राजापूर
राजापूर तालुक्यातील हातिवले येथे मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी झालेल्या दुचाकीच्या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या गोवळ येथील तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रसाद भाटले असे या तरूणाचे नाव असून या घटनेने गोवळ गावावर शोककळा पसरली आहे.
गोवळ मधलीवाडी येथील प्रसाद भाटले हा तरूण शुक्रवारी दुपारी राजापूरातून दुचाकीने खारेपाटण येथे जात होता. मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले येथील पेट्रोलपंपानजीक आला असता समोरून भरधाव वेगात येणाऱया दुचाकीने प्रसाद याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये तो रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची स्थिती नाजूक बनल्याने अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. रत्नागिरी येथील खासगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. प्रसाद भाटले याच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने संपूर्ण गोवळ गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान प्रसादच्या भावाचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे आई-वडील आणि बहीणींची सर्व जबाबदारी प्रसादच्या खांद्यावर होती. मात्र त्याच्यावरच काळाने घाला घातल्याने भाटले कुटुंबाचा आधारच हरपला आहे.