विदेश मंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन – हार्ट ऑफ आशिया परिषदेत आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी एकत्र
वृत्तसंस्था / दुशांबे
अफगाणिस्तानात दुहेरी शांतता प्रक्रियेची गरज आहे. तसेच अफगाणिस्तानातील शांतता शेजारी देशांच्या हिताची असल्याचे उद्गार विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी हार्ट ऑफ आशिया परिषदेत बोलताना काढले आहेत. दुशांबेत होत असलेल्या या परिषदेत अफगाणिस्तानातील शातंता प्रक्रियेवर सहमती निर्माण करण्यासाठी सुमारे 50 देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत.
अफगाणिस्तानात एक स्थायी शांततेसाठी आम्हाला प्रत्यक्षात ‘दुहेरी शांतते’ची आवश्यकता आहे. म्हणजेच अफगाणिस्तानात शांतता आणि अफगाणिस्तानच्या आसपास शांतता. याकरिता संबंधित देशाच्या आत आणि त्याच्या भोवताली सर्वांच्या हितसंबंधांच्या सामंजस्याची आवश्यकता असते. शांतता प्रक्रिया यशस्वी करण्याची इच्छा असल्यास चर्चा करणारे घटक एका राजनयिक तोडग्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिबद्ध असणे आवश्यक असल्याचे जयशंकर म्हणाले.
परिषद सुरू होण्यापूर्वी जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांची भेट घेतली आहे. अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील 19 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी दोघेही परस्परांमध्ये थेट चर्चा करत आहेत. या युद्धात हजारो लोक मारले गेले असून अफगाणिस्तानातील अनेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत. अफगाणिस्तानातील शांतता तसेच स्थैर्याकरिता भारत एक महत्त्वाचा घटक राहिला असून युद्धग्रस्त देशात पुनउ&भारणी कार्यांकरिता यापूर्वीच 2 अब्ज डॉलर्सची मदत केली आहे.
शांततापूर्ण अफगाणिस्तानसाठी सुरक्षा तसेच सहकार्यावर क्षेत्रीय प्रयत्न ‘इस्तंबुल प्रोसेस’ अंतर्गत मंत्रीस्तरीय बैठक होत आहे. पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी हे देखील या परिषदेत सामील झाले आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांची भेट होण्याची शक्यता व्यक्त होत असली तरीही याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.