ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
भारत 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना अफगाणिस्तान मात्र तालिबानच्या ताब्यात जात होता. अफगाणिस्थानचे नागरिक जीवाच्या आकांताने सैरभैर पळत होते कारण यापुर्वी तालिबान शासन त्यांनी अनुभवले होते. तालिबान शासनाचे महिला, बालके, मुली, पुरुष यांच्यासाठी जुलमी कायदे चांगलेच ज्ञात होते. १५ ऑगस्ट रोजी अफगाण सैन्याने सरळ शरणागती पत्करली आणि राष्ट्रध्यक्ष अश्रफ घनी यांनी देश सोडत पलायन केले होते. अशा स्थितीमध्ये सामान्य नागरिकांचे लोंढे विमान तळावर दाखल झाले होते. ही सगळी दहशत निर्माण करण्यात दोन भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची भीती माजी परराष्ट्रमंत्री शशी थरुर यांनी व्यक्त केली आहे.
माजी परराष्ट्रमंत्री शशी थरुर यांनी एका पत्रकाराने पोस्ट केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती मल्याळी भाषेत संवाद साधत असताना त्यांच्याकडे शस्त्रे देखील दिसून येत आहेत. त्यांच्या संवादातून ते मल्याळी तालिबानी असल्याचे वाटते. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये तालिबानी लोक काबुलच्या बाहेरील भागात पोहोचल्यावर त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर काही तासांतच त्याने काबूल ताब्यात घेतले होते.
थरुर यांच्या या व्हिडिओवर त्या पत्रकारने भाष्य करत त्या व्यक्ती केरळच्या नाहीत तर ते झाबुल प्रांताचे बलुच असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्यामध्ये ब्राह्वी बोलतात, असे देखील सांगितले आहे. त्यांच्यामध्ये ब्रावी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. ही भाषा तेलुगु, तमिळ, मल्याळम इत्यादीसारखीच एक द्राविडियन भाषा असल्याचे स्पष्टीकरण त्या पत्रकाराने दिले आहे.