बेळगाव-दिल्ली विमानफेरीला 13 ऑगस्टपासून सुरुवात : बेळगाव परिसरातील नागरिकांचा प्रवास सोयीचा होणार
प्रतिनिधी /बेळगाव
देशाची राजधानी असणाऱया दिल्ली शहराला दि. 13 ऑगस्टपासून विमानफेरी सुरू होणार आहे. स्पाईस जेट कंपनी आठवडय़ातून दोन दिवस या मार्गावर सेवा देणार आहे. आता अवघ्या 2 तास 25 मिनिटांमध्ये बेळगावमधून दिल्ली गाठता येणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. मागील अनेक दिवसांपासून मागणी असलेली विमानफेरी अखेर सुरू झाल्याने बेळगावकर आता ‘अब दिल्ली दूर नही’ असे म्हणू लागले आहेत.
बेळगाव हे व्यापारी पेठ, लष्करतळ म्हणून ओळखले जाते. यामुळे राजधानी दिल्ली येथून प्रवाशांची नेहमीच ये-जा असते. यापूर्वी नागरिकांना रेल्वेने दोन दिवस घालवून दिल्ली गाठावी लागत होती. बेंगळूर, हैदराबाद, मुंबई येथील कनेक्टिंग फ्लाईटने दिल्लीला जावे लागत होते. यामध्ये वेळ व पैसा वाया जात असल्याने थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती. राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याने ही मागणी रखडली होती. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव व बेळगावचे सुपुत्र गिरीष होसूर यांच्या प्रयत्नामुळे बेळगाव-दिल्ली विमानसेवेला हिरवा कंदील मिळाला.
आठवडय़ातील दोन दिवस विमानफेरी सुरू होणार
स्पाईस जेटने या मार्गावर विमानफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार व शुक्रवारी असे आठवडय़ातील दोन दिवस विमानफेरी सुरू होणार आहे. लेह-दिल्ली-बेळगाव-दिल्ली अशी ही फेरी असणार आहे. दुपारी 2.30 वा. दिल्लीमधून निघालेले विमान सायंकाळी 4.45 वा. बेळगावला पोहोचणार आहे. सायंकाळी 5.05 वा. बेळगावमधून निघालेले विमान सायंकाळी 7.25 वा. दिल्लीला पोहोचणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली.
अवघ्या अडीच तासांमध्ये दिल्ली गाठता येणार
बेळगावमधून दिल्लीला थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून अवघ्या अडीच तासांमध्ये दिल्ली गाठता येणार आहे. बोईंग विमान असल्याने बेळगाव तसेच परिसरातील नागरिकांचा प्रवास सोयीचा होणार असल्याचे राजेशकुमार मौर्य यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
– राजेशकुमार मौर्य (संचालक-बेळगाव विमानतळ)