अमरावती/प्रतिनिधी
त्रिपुरातील अत्याचार आणि प्रार्थनास्थळांची नासधूस केल्याच्या घटनेचे आज अमरावतीत पडसाद उमटले. अमरावतीत भाजपाने बंदचं आवाहन केलं आहे. यानंतर अमरावतीत आज (१३ नोव्हेंबर) पाळण्यात येत असलेल्या बंदला हिंसक वळण लागलं आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या आंदोलनात मोठ्यासंख्येने तरुण उतरला आहे.
अमरावतीत बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दलही चौकाचौकात तैनात करण्यात आलं. मात्र, असं असतानाही समोर आलेल्या दृष्यांनुसार आंदोलक बंद दुकानांची कुलुपं तोडून तोडफोड करत असल्याचंही दिसत आहे. तसेच दुकानांबाहेरील साहित्याचंही नासधूस केली जात आहे. त्यामुळे आक्रमक आंदोलकांसमोर पोलीस यंत्रणा तोकडी पडत असल्याचं चित्र आहे. नागपूरचे पोलीस महासंचालक संदीप पाटील हे अमरावतीत दाखल झाले आहेत. त्यांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.