अरविंद केजरीवाल यांची घोषणा : भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याची हमी
प्रतिनिधी /पणजी
गोव्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भंडारी समाजातील व्यक्ती असेल, असे जाहीर केलेल्या आम आदमी पक्षाने आपल्या वचनाची पूर्तता करताना ऍड. अमित पालेकर यांची निवड जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
या घोषणेमुळे राज्यात विधानसभा निवडणुकीत रंगत आली असून आपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करून प्रचारात आघाडी घेतली आहे. गोव्यात दुर्लक्षित झाल्याने दुखावलेल्या भंडारी समाजाला प्रतिनिधीत्व देऊन आपने वचनपूर्ती केली आहे, मात्र हे करताना आम्ही कोणत्याही प्रकारे जातीचे राजकारण केलेले नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
गोव्याला बदल हवाय
आप’चा मुख्यमंत्री चेहरा म्हणून ऍड. पालेकर यांची घोषणा करताना आनंद होत आहे. पालेकर हे एका नव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करत आहेत आणि सध्यस्थितीत त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार आम्हाला मिळू शकला नसता, असे ते म्हणाले. गोव्याला बदल हवा आहे आणि आपला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली सरकारने चालविलेल्या कार्यावर लोक प्रभावित झाले आहेत, असेही ते म्हणाले.
आप हा गोमंतकीयांसमोर पर्याय
तेच पक्ष आणि त्याच चेहऱयांना कंटाळलेले गोमंतकीय नव्या पर्यायाच्या शोधात होते. आप च्या रुपाने त्यांना आता नवीन पर्याय सापडला आहे. गोमंतकीयांनी या संधीचे सोने करावे व आपला संधी देऊन गोव्याच्या विकासात सहकार्य करावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.
आपचे पालेकर हे खरे लढवय्ये
असंख्य घोटाळे, फसवणूक आणि बेकायदेशीर गोष्टी उघड करून विद्यमान सरकारला घेरणारे पालेकर हे खरे लढवय्ये आहेत. त्यांनी अनेक अडचणींवर मात केली असून या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी तरुण वयातच अनेक लढाया लढल्या आहेत. त्यामुळे पालेकर हे गोमंतकीयांसाठी नवी आशा आहेत, असे केजरीवाल म्हणाले.
पत्रकार परिषदेस व्यासपीठावर दिल्लीच्या आमदार आतिशी आणि राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांची उपस्थिती होती. तसेच अन्य मान्यवरांमध्ये पालेकर यांची आई, पत्नी आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते.
राज्याचे गतवैभव परत आणण्याचे प्रयत्न करेन : पालेकर
सांताप्रुझचे उमेदवार तथा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेले पालेकर यांनी मनोगत व्यक्त करताना, आपण टॉपर असूनही लाच देणे शक्य न झाल्याने सरकारी नोकरी मिळवू शकलो नाही. आज आपणच ’सरकारी नोकरीतील घोटाळा’ उघडकीस आणला आहे, असे ते म्हणाले. दिल्लीत आप सरकारने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन केले आहे. गेल्या सहा वर्षांत मानवी विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. याऊलट गोव्यात केवळ राजकारण्यांचे जीवन बदलले आहे. स्वातंत्र्याच्या 60 वर्षांनंतरही गोव्यात मूलभूत सुविधा दिसत नाहीत. हे पक्षीय राजकारण संपवायला हवे. गोव्याला बदलाची गरज आहे. ’आप’ची सत्ता आल्यास गेल्या 20 वर्षांत गमावलेले गोव्याचे वैभव परत आणण्याचे आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे प्रयत्न करेन,’ असे पालेकर यांनी पुढे सांगितले.
अमित जातीधर्मात कधीच भेदभाव करणार नाही : ज्योती पालेकर
आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ’आप’ने भंडारी समाजाचा मुख्यमंत्री चेहरा जाहीर केला असला तरी, मी वचन देते की, जात-धर्म, समाज यांमध्ये कोणताही भेदभाव न करता अमित सर्व गोमंतकीयांची सेवा करेल, अशी ग्वाही अमित यांच्या मातोश्री तथा दोन वेळा मेरशीच्या सरपंच राहिलेल्या समाजकार्यकर्त्या ज्योती पालेकर यांनी दिली.
अमितमध्ये शालेय जीवनापासूनच नेतृत्वगुण होते. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांकडून त्याने अनेक गोष्टी शिकून घेतल्या आहेत. ज्यामुळे तो आजचा सक्षम नेता बनला आहे, असेही त्या म्हणाल्या.
सामान्य व्यक्ती ज्या पदाचे केवळ स्वप्नच पाहू शकते तेच पद ’आप’ने अमितला बहाल करून त्याच्या दूरदृष्टीला पंख दिले आहेत. आमच्याकडे प्रामाणिक, विश्वासार्ह आणि दयाळू असा नेता आहे. 22 वर्षे दृढनिश्चयाने आणि प्रामाणिकपणे काम करताना आपण त्याला पाहिले आहे, असे सांगून अमित हा सर्व गोमंतकीयांसाठी आशेचा किरण ठरेल, असे त्यांची पत्नी ऍड. रसिका यांनी सांगितले.