वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अलीकडच्या दिवसात अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा गतीने पूर्ववत होत असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे. अर्थव्यवस्थेत चांगली प्रगती दिसून आली असून उत्सवानंतर मागणीतील स्थिरतेवर लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
शक्तीकांत दास म्हणाले, कोरोनाचा परिणाम कमी झाल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेने चांगली सुधारणा दाखवली आहे. अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी होत आहे. उत्सवी काळात मागणीचा कल वाढीव राहिल्याने अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त करता आली आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था 23.9 टक्क्यांनी आक्रसल्यानंतर दुसऱया तिमाहीत काहीशी प्रगती झालेली दिसली. दुसऱया तिमाहीनंतर परिस्थिती वेगाने पूर्ववत होताना दिसत आहे.
बंधने हटवल्यानंतर प्रगतीला दिशा
कोरोनाशी लढताना इतर देशांच्या तुलनेत भारताने अनेक उपाययोजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अर्थव्यवस्थेत 9.5 टक्के इतकी घट होण्याचा अंदाज वर्तवला होता. लॉकडाऊनच्या काळात अवलंबलेली बंधने मागे घेण्यात आल्यानंतर अर्थव्यवस्थेने प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. उत्सवी काळात अर्थव्यवस्थेला चांगली कामगिरी करता आली आहे.