बेळगाव / प्रतिनिधी
अर्थसंकल्प ही मोठी संकल्पना आहे. सप्टेंबर महिन्यापासून सध्या देशाची असणारी आर्थिक परिस्थिती, विविध क्षेत्रांचा विकास, विकासदर या सर्वांचा विचार करण्यात येत असतो. अर्थसंकल्पाचे देशाच्या विकासामध्ये दूरगामी परिणाम होत असल्यामुळे खूप खबरदारी घ्यावी लागते. परंतु मागील 20 ते 25 वर्षांपासून हा अर्थसंकल्प राजकीयदृष्टीने मांडण्यात येत असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे निवृत्त प्रा. वसंत जुगळे यांनी केले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित ज्योती इकॉनॉमिक्स ऍण्ड कॉमर्स फोरमच्यावतीने मंगळवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘अर्थसंकल्प 2020-21 एक विश्लेषण’ या विषयावर त्यांनी माहिती दिली. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, सचिव सुभाष ओऊळकर, सहसचिव प्रा. व्ही. एल. पाटील, प्राचार्य एस. एम. पाटील, प्राचार्य आर. डी. शेलार, समन्वयक प्रा. एम. व्ही. शिंदे उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, 1733 मध्ये पहिल्यांदा जगात अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तर देशात 1860 मध्ये जेम्स विल्सन यांनी प्रथम अर्थसंकल्प सादर केला. प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास करून त्याविषयीच्या तरतुदी कराव्या लागतात. सध्या देशात तरुणांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने त्यांना कौशल्य विकासावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आल्याचे सांगितले.
विद्यार्थिनी यशश्री पाटील हिने उपस्थितांचे स्वागत केले. एम. व्ही. शिंदे यांनी परिचय करून दिला. प्रा. ए. एन. पाटील यांनी बक्षिसे जाहीर केली. गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा जाधव व प्रा. लक्ष्मी कंग्राळकर यांनी केले. सौरभ गावडे यांनी आभार मानले..