अपघातात मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख देण्याचे आदेश
प्रतिनिधी / बेळगाव
मोटारसायकलने कारला धडक दिल्यानंतर मोटारसायकल चालविणाऱया अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. एक तर वाहन चालविण्याचा परवाना नाही, हेल्मेट नाही, एकाच मोटारसायकलवर तिघेजण, विमा नाही अशा परिस्थितीत हा अपघात प्रभूनगर (ता. खानापूर) येथे झाला होता. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर त्यामधील दोघांच्या कुटुंबीयांनी नुकसानभरपाईसाठी न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी न्यायालयाने त्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये 6 टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मोटारसायकल क्रमांक एमएच 14 एफएन 6699 यावरून आमन आनंद कपिलेश्वरी, हर्ष सुनील सांगावकर आणि अथर्व जाधव हे तिघे बेळगावकडे येत होते. यावेळी प्रभूनगरजवळ कार क्रमांक केए 31 एम 6355 ला धडक दिली. यामध्ये तिघेही जागीच ठार झाले. अथर्व जाधव हा दुचाकी चालवत होता तर आमन आणि हर्ष हे मागे बसले होते. त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचा वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. इतर कागदपत्रेही नव्हती. त्यामुळे पोलिसांनी या तिघांवरच गुन्हा नोंदविला होता.
तरी देखील 1994 कायदा कलम 163ए अन्वये त्या दोघांच्या कुटुंबीयांना विमा कंपनीने प्रत्येकी 5 लाख रुपये सहा टक्के व्याजासह दिले आहेत. या दोघांच्यावतीने ऍड. एन. आर. लातूर यांनी काम पाहिले.
कागदपत्रे नसली तरी नुकसानभरपाई मिळते…
कागदपत्रे नाहीत म्हणून नुकसानभरपाई मिळत नाही तसेच आपल्यावरच गुन्हा दाखल होतो म्हणून बरेच जण न्यायालयाची पायरी चढत नाहीत. मात्र, कागदपत्रे नसली तरी नुकसानभरपाई मिळत असते. अपघात घडल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा जखमी झालेल्या व्यक्तीने पुढे येणे गरजेचे असल्याचे मत ऍड. एन. आर. लातूर यांनी व्यक्त केले.
नियमानुसार कागदपत्रे असणे हितकारक
अपघात घडू नये, जखमी होऊ नये किंवा कुणाचाही मृत्यू होऊ नये असे साऱयांनाच वाटते. मात्र, बऱयाच वेळा न कळत असो किंवा बेजबाबदारपणामुळे अपघात घडतात. जर स्वतःचे तसेच कुटुंबाचे भले व्हायचे असेल तर वाहनाची सर्व कागदपत्रे असणे फायद्याचेच आहे. एखाद्या वेळी न कळत अपघातामध्ये मृत्यू झाला तर त्याचे कुटुंबीय अडचणीत येतात. त्यांचे पालनपोषण करणारे कोणीच नसतात. अशावेळी जर सर्व कागदपत्रे असतील तर निश्चितच त्यांच्या कुटुंबीयांना मोठा फायदा होतो. कागदपत्रे नसतील तर 5 लाख आणि कागदपत्रे असतील तर 20 लाखांपासून 50 लाखांपर्यंत नुकसानभरपाई मिळू शकते. तेव्हा वाहनाची सर्व कागदपत्रे असणे हे नेहमीच हितकारक असल्याचे ऍड. लातूर यांनी सांगितले.