भारताची मशरुम सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱया सोलन येथील एका तरुण शेतकऱयाने एक लाख रुपये किलो दराने विकल्या जाणाऱया अळंबीचे उत्पादन घेण्यात यश संपादन केले आहे. अनेक प्रयोग आणि कठोर परिश्रम केल्यानंतर त्यांना हे साध्य झाले आहे. आपल्या खासगी प्रयोगशाळेत तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांनी या अळंबीचे उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान शोधून काढले आहे.
या वैशिष्टय़पूर्ण अळंबीचे उत्पादन देशातील केवळ 100 शेतकरी घेत आहेत. संशोधक शेतकरी निशांत गाजटा यांचे वैशिष्टय़ असे, की त्यांनी या अळंबीचे खात्रीलायक उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान शोधले आहे. या अळंबीची लागवड करता येत नाही, ही प्रमुख अडचण होती. ती गाजटा यांनी सोडविली असल्याचा दावा केला आहे. निशांत गाजटा बी.टेक. पर्यंत शिकले असून आधी चंदीगढ येथे खासगी कंपनीत नोकरी करीत होते. तथापि, कोरोनाकाळात त्यांची नोकरी सुटल्यामुळे चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी शेतीचा आधार घेतला. त्यातूनच त्यांना अळंबी उत्पादनाची कल्पना सुचली. पूर्वीपासून त्यांचे प्रयोग सुरूच होते. हे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आठ महिन्यांपूर्वी अळंबीचे उत्पादन घेण्यास प्रारंभ केला. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत 15 ते 18 किलो अळंबी तयार होण्याची त्यांना अपेक्षा आहे. या अळंबीला 20 लाख रुपये किंमत मिळू शकते. ही अळंबी अनेक रोगांवर तसेच शरीराचा अशक्तपणा घालविण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे तिला एवढी मोठी किंमत मिळू शकते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची अद्भूत शक्ती या अळंबीत आहे. तसेच मधुमेहावर नियंत्रण मिळविण्याचा तो नैसर्गिक उपाय आहे. कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखणे, सूज कमी करणे, मलेरिया बरा करणे असे अनेक गुणधर्म या अळंबीचे आहेत.