भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेंची इच्छूक उमेदवारांवर टीका
प्रतिनिधी /पेडणे
निवडणुका जवळ आल्या की पावसाळय़ात जशी अळंबी उगवतात तसे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असणारे उगवतात आणि आपण स्वतःच भाजपचा उमेदवार म्हणून घोषणा करतात, अशी टीका गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी पेडणे मतदारसंघाच्या दौऱयात केली आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यासह भाजप समर्थक यांच्याबरोबर तानावडे यांनी हा दौरा केला. दौऱयादरम्यान त्यांनी इब्रामपूर, चांदेल, हळर्ण, कासारवर्णे, वारखंड या भागात सभा घेतल्या.
पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस, युवा अध्यक्ष मंदार परब, पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर, उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, माजी उपनगराध्यक्ष रामा सावळ देसाई, सुशांत मांदेकर, विश्वनाथ तिरोडकर, आबा तळकटकर, चांदेल सरपंच संतोष मळीक, रुदेश नागवेकर, जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे, जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर, सुभाष सावंत, दशरथ महाले, संतोष महाले आदी समर्थक उपस्थित होते.
विकासासामुळे आजगावकरांना वाढता पाठिंबा
भाजपा केवळ निवडणुकीच्या काळात जनतेकडे येत नसतो तर तो वर्षाचे बाराही महिने कल्याणकारी योजना घेऊन येत असतो. बाबू आजगावकर यांनी केलेल्या विकासासामुळे त्यांना वाढता पाठींबा मिळत आहे. जे पक्षासाठी काम करतात त्यांची पक्ष दखल घेतो. बाबू आजगावकर यांनी बिनधास्त राहावे, जे पक्षात नाही त्यांनी स्वतःला पक्षाचा उमेदवार म्हणून जाहीर करू नये, असे आवाहनही तानावडे यांनी केले. काँग्रेस आणि इतर पक्ष केवळ अल्पसंख्याक जनतेचा वापर करतात आणि धर्माधर्मात, समाजामध्ये फूट टाकत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
विरोधक चंद्र-तारे आणून देण्याचीही आश्वासने देणार
जे पार्टी सत्येवर येणार नाही, किंवा ज्या पार्टीचे आमदारही नाहीत किंवा होणारही नाहीत, असे राजकारणी चंद्र-तारे आणून देणार अशीही आश्वासने देणार, त्यांना शब्द नाही, मात्र बाबू आजगावकर यांनी तुम्हाला शब्द दिला तर तो पूर्ण करण्याची ताकत त्यांच्याकडे आहे, असेही तानावडे म्हणाले.
रोजगार देणारी निवडणूक : आजगावकर
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आगामी निवडणूक मतदारसंघातील बेरोजगार युवकांना रोजगार देणारी असणार आहे, प्राधान्यक्रमाने बेरोजगारीचा प्रश्न होवू घातलेल्या प्रकल्पातून सुटू शकतो असा पुनरुच्चार केला. निवडणुका जवळ आल्या की काहीजण एक दोघांना पोटल्या वाटतात, कोण दोन झोपडय़ांना पत्रे घालतो, कोण प्लास्टिकचा माटव घालतो आणि प्रसिद्धी मिळवतो. मात्र कोरोना काळात आम्ही साडेनऊ हजार घरात मोफत रेशन कोटा पुरवला, त्याची कुठे प्रसिद्धी केली नाही. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.