प्रतिनिधी / बेळगाव
बेशिस्त पार्किंग… रस्त्यावरील अतिक्रमणे… संथगतीने सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे… खोदलेले रस्ते… वाहतुकीसाठी बंद असलेले काही रस्ते… वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन…. वाढती वाहनांची संख्या यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सम्राट अशोक चौक ते आरटीओ सर्कलपर्यंत दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावर वाहनचालकांकडून वाहतुकीचे कोणतेच नियम पाळले जात नाहीत. रस्त्याच्या कडेला जागा दिसेल तेथे वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्याबरोबर ठिकठिकाणी खासगी वाहनधारकांकडून वाहने उभी करून प्रवासी वाहतूक केली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या वाहतूक कोंडीतून बाहेर पडताना वाहनधारकांची चांगलीच दमछाक होत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे बहुतांश रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू आहे. काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी इतर लहान रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरटीओ सर्कल ते सम्राट अशोक चौकाकडे जाणाऱया रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नित्याची बाब ठरत आहे.
रस्त्यांची कामे सुरू असल्याने अरुंद झालेल्या रस्त्यांवर एकाच वेळी ट्रक, बस व खासगी वाहने आल्यास वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीतून पायी चालणाऱया नागरिकांबरोबरच वाहनचालकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.