नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माजी केंद्रीय मंत्री आणि काँगेसचे पंजाबचे ज्येष्ठ नेते अश्विनीकुमार यांनी काँगेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मनमोहनसिंग यांच्या मंत्रीमंडळात पूर्वी असणाऱया ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याने पक्ष सोडल्याची ही पहिलीच घटना आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. निवडणूक ऐन तोंडावर आलेली असताना हा धक्का काँगेसला बसला आहे.
पक्ष सोडताना कुमार यांनी काँगेस श्रेष्ठीवर टीकेचे प्रहार केले आहेत. काँगेस पक्षात आता कोणीही जबाबदार नेता उरलेला नाही. पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व दिशाहीन आणि उदासिन बनले आहे. अशा स्थितीत पक्षाचा भार वाहण्यासाठी आपले खांदे फारच दुर्बळ ठरत आहेत. म्हणून पक्ष सोडून नवा प्रारंभ करण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे त्यांनी सोनिया गांधींना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले. काँगेसच्या नेतृत्वाने 23 ज्येष्ठ नेत्यांच्या पत्राकडेही दुर्लक्ष केले. काँगेस आता कमजोर झाली असून प्रस्थापितांविरोधात संघर्ष करण्याची क्षमता उरलेली नाही. म्हणून कार्यकर्त्यांचा पक्षावर विश्वास उरलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.