पदवीधर तरुणीचा अनुकरणीय उपक्रम : लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून भरतो वर्ग
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
कोरोना लॉकडाऊनमुळे मार्चपासूनच शाळा बंद झाल्या. परीक्षा न होताच विद्यार्थ्यांना पासही करण्यात आले. त्यातच 15 जूनपासून शैक्षणिक वर्षही सुरू झाले, तरीही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. कोरोनामुळे या शाळा कधी सुरू होतील, याबाबत निश्चितता नाही. असे असतानाच ऑनलाईन वा इतर मार्गांचा वापर करून मुलांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आजही आपल्याकडे असे काही भाग आहेत, की जेथे ना इंटरनेट, ना पालकांजवळ इंटरनेटसाठी आवश्यक असलेले फोन. अशीच स्थिती असलेल्या असलदे धनगरवाडीतील मुलांसाठी 15 जूनपासून वाडीतच रोज दोन तासांची शाळा भरू लागली आहे. वाडीतील पदवीधर तरुणी असलेल्या सविता जानू खरात हिने ही शाळा सुरू केली आहे. सविताने ज्ञानार्जनासाठी उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.
आज सर्वत्र शाळा बंद पण शिक्षण सुरू, अशी स्थिती आहे. प्रशासकीय पातळीवर विविध ऍप, ऑनलाईन, गरजेनुसार ऑफलाईन शक्य असल्यास अशाप्रकारे मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यातील बहुतांश शिक्षणासाठी मोबाईल, त्यासाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध असण्याची गरज आहे. सिंधुदुर्गसारख्या जिल्हय़ात आजही अनेक भाग असे आहेत, की जेथे इंटरनेट सुविधा नाही. दुसरीकडे यासाठी आवश्यक अँड्रॉईड मोबाईल घेण्याएवढी काही पालकांची आर्थिक स्थितीही नाही. अशा स्थितीत या मुलांनी करायचे काय? हा प्रश्न आहेच. कोरोनाच्या भितीमुळे शिक्षक वा मार्गदर्शकही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
पहिली ते सातवीच्या 13 मुलांना शिकविते
या साऱयावर पर्याय काढण्याचे काम असलदे धनगरवाडी येथील सविता जानू खरात या पदवीधर तरुणीने केला आहे. तिने 15 जूनपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या 13 मुलांना रोज सायंकाळी 5 ते 7 यावेळेत वाडीतच शिक्षण देण्यास सुरुवात केली. तीही मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच. तिच्या या वर्गात असलदे तावडेवाडी व नांदगाव सरस्वती हायस्कूलमध्ये जाणारी तिच्या वाडीतील मुले आहेत. 15 जूनपासून ती या मुलांना रोज दोन तास शिक्षण देते, असे सविताने सांगितले.
वाडीतील मुलांना रोज दोन तास शिकविते
सविता खरात या तरुणीला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड. असलदे तावडेवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर माध्यमिकचे शिक्षण नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल येथे झाले. त्यानंतर कासार्डे ज्युनिअर कॉलेजमध्ये तिने बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर रिगल कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती फणसगाव कॉलेजमध्ये कॉम्प्युटर लॅबमध्ये कार्यरत आहे. तिचे वडील शेतकरी आहेत. घरची स्थितीही बेताचीच. मात्र, लॉकडाऊनच्या काळात असेच घरी बसून राहण्यापेक्षा आपल्या वाडीतील मुलांना शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय तिने घेतला. सद्यस्थितीत ती ज्याठिकाणी कामावर जाते, ते कॉलेजही बंद आहे. अशावेळी शिकण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध नसलेल्या आपल्या वाडीतील मुलांना रोज दोन तास शिक्षण देण्याचा निर्णय तिने घेतला व वाडीतील सर्वांनीच तिला सहकार्य केले.
नियमांचे पालन करून शिक्षण
15 जूनपासून आपण रोज पाच ते सात यावेळेत पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांसाठी वर्ग घेते. मुले मास्क वापरत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच येतात. दोन तास शांतपणे अध्ययन करून नंतरच आपापल्या घरी जातात, असे खरात हिने सांगितले. तिने उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद नव्हे, तर नियमांचे पालन करत अनुकरणीय असेच आहे.