नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱया शेतकऱयांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याची मागणी शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केली आहे. तसेच आपण स्वतःही लस घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेकडो शेतकरी दिल्लीच्या टिकरी सीमारेषेवर आंदोलन करत असून कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱया मागील तीन-साडेतीन महिन्यांमध्ये झाल्या आहेत. मात्र, अद्याप या समस्येवर तोडगा निघाला नसल्याने आंदोलन सुरूच आहे. त्यातच देशात कोरोना संसर्ग वाढत असल्याने सावधगिरीची उपाययोजना म्हणून टिकैत यांनी लसीकरणाची मागणी केली आहे. आंदोलनस्थळी मोठय़ा संख्येने शेतकरी असल्यामुळे या आंदोलकांना कोरोनाची लस देण्याची मागणी टिकैत यांनी केली आहे.