एकनाथ गावकर/ केपे
‘आबोली, शेंवती फुलोला, धवेल्या माटवाक पावली, शबय शबय शबय’ अशा गीतावर ढोल-ताशे व कासाळे या वाद्यांच्या गजरात आंबावलीतील पारंपरिक इंत्रुज उत्सव आज रविवारी साजरा होणार आहे. आजच्या या संगणक युगात आणि बदलत्या जीवनशैलीत लोकपरंपरेचे जतन करणे हे मोठे आव्हान आहे. अशा वेळी आंबावली-केपे या गावात आजही ऍड. जॉन फर्नांडिस यांच्या पुढाकाराने बंद पडलेला इंत्रुज पुन्हा सुरू करून त्याला नवसंजीवनी देण्याचे काम केले गेले आहे. गेली अनेक वर्षे ते चालूही ठेवले आहे. या परिसरात एकमेव पारंपरिक इंत्रुज उत्सव आंबावली भागात पाहायला मिळतो.
पूर्वीपासून आंबावलीतील इंत्रुजची सुरुवात पहिल्या रविवारी गावातील चर्चचे फेस्त झाल्यानंतर होत असे. फेस्तानंतर गावच्या मांडावर इंत्रुजचा सराव करत असत. फेस्त व इंत्रुज सुरू होण्यात एक आठवडय़ाचा वेळ असे. यात गावातील लग्ने (काजार) करण्याची परंपराही पूर्वी होती व त्यातील नव्या जोडप्यांना घरी आणून ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करत असत. इंत्रुजच्या पहिल्या दिवशी सकाळी व रात्री गावच्या मांडावर ढोल-ताशांच्या गजरात ‘भोलोले शिंदेयेक मोकोना, माय मेल्यार सुनेक दुखोना, शबय’ अशा गीतांनी सुरुवात करत. त्यानंतर ‘सात जाण भावाले एकली भयणुली बा, भयणुले दिवाले रूमडे फुलो बा’ अशा चौरंगी गात असत.
चौरंगी सपल्यानंतर चौगाचो, रंगसाळे, कोल्हाभोवर, भायर भितर असे अनेक खेळ खेळत (तालगडी प्रकार) व गीते गात लोकनृत्ये सादर करत असत. त्यानंतर दुसऱया दिवशीही मांडावर जाऊन इंत्रुज साजरा करत व ती रात्र जागवत असत. शेवटय़ा दिवशी सकाळी ढोल-ताशांच्या गजरात मांडावरून घराघरात जात असत. यावेळी वाडय़ावर व दुसऱया गावात जात असत. रात्री पुन्हा मांडावर येऊन विधीनुसार त्याची सांगता करत असत.
बंद पडलेल्या इंत्रुजला 2008 मध्ये चालना
1997 च्या दरम्यान हा इंत्रुज बंद पडला. त्यानंतर 2008 साली ऍड. जॉन फर्नांडिस यांनी पुढाकार घेऊन त्याला नवसंजीवनी देण्याचे काम केले व आजही तो साजरा करणे कायम आहे. गावातील मांड संस्कृती लुप्त झाली असली, तरी मांडाच्या जागी ते आपल्या घराच्या अंगणात इंत्रुजचा सराव करतात. बदललेल्या प्रवाहामुळे इंत्रुजच्या पहिल्या दिवशीच गावातील घराघराला ढोल-ताशांच्या गजरात भेट देऊन उत्सव साजरा करतात. हे करत असताना पूर्वीप्रमाणेच रंगीबेरगी टोप्या डोक्मयावर घालणे, विविध रंगांचे पोषाख करणे हे आजही कायम आहे. मात्र यात युवावर्गाची साथ बरीच कमी दिसते. तरीही त्यांनी इंत्रुज उत्सव मागील 14 वर्षांपासून साजरा करणे सातत्याने कायम ठेवले आहे. असे उत्सव टिकवून ठेवण्याकरिता लोकांच्या आधाराची गरज आहे.