कोकण कृषी विद्यापीठातील पत्रकार परिषदेत कृषी मंत्री दादा भुसे यांची माहिती
प्रतिनिधी/दापोली
वेगाने वातावरणात होणारे बदल, वन्यप्राण्यांचा होणारा त्रास यामुळे येथील बागायतदारांना वारंवार आर्थिक नुकसानीला समोर जावे लागते. यासाठी ऍव्होकॅडो या फळाचा आंबा बागायतदारांना उत्तम पर्याय आहे. यासाठीची लागवड प्रायोगिक तत्वावर यशस्वी होत असल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दापोली येथे दिली.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा 2 वर्षातील कामाचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री भुसे विद्यापीठात आले असता कुलगुरू दालनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, कोकणावर सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहेत. वन्यप्राण्यांचा उपद्रवही शेतीला मोठय़ा प्रमाणात आहे. यावर पर्याय म्हणून ऍव्होकॅडो या आफ्रिकन वनस्पतीची प्रायोगिक तत्वावर विद्यापीठात लागवड करण्यात आली आहे. याचा परिणामही उत्तम आहे. यामुळे भविष्यात आंबा व काजू बागायतीला ऍव्होकॅडो हा पर्याय ठरू शकतो. विशेष बाब म्हणून ही 200 रोपे आफ्रिकेतून मागणी करण्यात आली होती. याचे मॅगोस्टीन, डय़ुरीयन, रामबुतान, स्टारप्रुट आणि लोंगन आदी पाच वाण दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आले होते.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची 5 प्रक्षेत्रे आहेत. या पाचही प्र क्षेत्रांवर विद्यापीठ कृषी पर्यटन बस सुरू करणार आहे. येथील काजू बागायतदारांना हमीभाव देण्याबाबत व वाईन उत्पादनाबाबत निकष बदलण्याबाबतही त्यांनी सकारात्मक दर्शवली. कोकणात होणारा फणस, काळा भात, नाचणी सध्या दुर्लक्षित आहे. त्याचे पुनरूज्जीवन करणार आहे. कोकणात आंबा व भात ही दोन प्रमुख पिके घेण्यात येतात. मात्र भातानंतर दुबार पीक घेण्यात येत नाही. हे दुबार पीक घेण्याबाबत काय उपाययोजना करण्यात आवश्यक आहे, या बाबत कृषी विभागाला आपण आदेश दिल्याचे भुसे यांनी सांगितले.
स्थानिक आमदार योगेश कदम यांनी दापोली विधानसभा क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात हळदीची लागवड केली आहे. कोकणात हळदीचा प्रयोग यशस्वी झाला तर त्याला शासकीय पाठबळ देण्यात येईल. कृषी पर्यटनातून कोकणात मोठी संधी उपलब्ध आहे. यामुळे कृषी पर्यटनावर भर देण्यात येईल. या बाबतच्या सूचना आपण कृषी विभागाला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मे महिन्यात होणारा सुवर्ण पालवी हा उपक्रम कोणत्याही प्रायोजकाविना राबवण्याची भुसे यांनी घोषणा केली. या उपक्रमाला लागणारा सर्व खर्च शासन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चिपळूण येथे आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणच्या शेती नापीक झाल्या आहेत. या नापीक झालेल्या शेतीबाबत काय उपाययोजना करण्यात येतील, याचा कृषी विभाग व विद्यापीठ अभ्यास करणार असल्याचे ते एका उत्तरादाखल म्हणाले.
विद्यापीठातील रोजंदारीचा प्रश्न हा विद्यापीठापुरता मर्यादित नाही. तो राज्यव्यापी प्रश्न आहे. यामुळे याबाबत राज्याचा जो निर्णय होईल तो निर्णय येथे राबवण्यात येईल. शिवाय विद्यापीठ कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम बंद करणार नाही. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे भविष्यात नुकसान होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार योगेश कदम, कुलगुरू डॉ. संजय सावंत याच्यांसह विद्यापीठातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वाकवली केंद्रावरील ऍव्होकॅडो लागवड प्रयोगाचा शुभारंभ
कृषीमंत्री दादा भुसे यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रास भेट दिली. येथे ऍव्होकॅडोच्या दुसा, डय़ुक-7, आणि बॉन्टी या मूळकांडावरती कोकणातील बदलत्या हवामानात तग धरणाऱया आणि आंबा पिकास पर्यायी ठरु शकणाऱया मालुमा आणि हास या अधिक उत्पादन देणाऱया जातींची कलमे करुन अभ्यास करण्यात येत आहे. या प्रयोगाचा शुभारंभ भुसे यांच्याहस्ते करण्यात आला.
भुसे यांच्याहस्ते सेंद्रीय शेती प्रशिक्षण केंद्राच्या नूतन वास्तूचे उद्घाटन झाले. कोकणातील क्षेत्र हे सेंद्रीय शेतीसाठी अतिशय अनुकूल असून कोकणातून निर्यात होणारा हापूस आंबा, काजू, मसाला पिके, कंद पिके यावर संशोधनात भर द्यावा, असे आवाहन भुसे यांनी केले. यावेळी भुसे यांचा कुलगुरू डॉ. सावंत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर भुसे यांनी प्रक्षेत्रावर सुरू असलेल्या संशोधनांना भेट देत कौतुक केले. प्रक्षेत्रावरील विविध खते निर्मिती, गांडुळ खत प्रकल्प, ऍझोला निर्मिती, बायोगॅस निर्मिती, पशु संवर्धन, उद्यानविद्या पिके आदांचा एकत्रितपणे अंतर्भाव करून सेंद्रीय शेती पध्दतीचे प्रारूप तयार होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी जैविक खते उत्पादन प्रकल्प, बांबू मूल्यवर्धन प्रकल्पासही भुसे यांनी भेट दिली.