बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर वाहनांची गर्दी
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावपासून साधारण 50 किलो मीटर अंतरावर असलेल्या आंबोली घाटातील धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांची पावले आंबोलीच्या दिशेने वळू लागली आहेत. कोकणात होत असलेल्या पावसामुळे आंबोलीतील धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर वाहनधारकांची वर्दळ वाढली आहे. विशेषतः शनिवार व रविवारच्या दिवशी दुचाकी, चारचाकी घेऊन जाणाऱया वाहनधारकांची संख्या वाढली आहे.
आंबोली येथील मुख्य धबधब्याकडे जाण्यासाठी पर्यटकांची पसंती अधिक असते. बेळगाव, चंदगड, आजरा, खानापूर तालुक्मयातील पर्यटक आंबोलीकडे जात आहेत. बेळगाव परिसरात म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने गोकाकसह सुंडी, किटवाड आणि तिलारी येथील धबधबे अद्याप प्रवाहित झाले नाहीत. मात्र आंबोली आणि परिसरात पाऊस होत असल्याने येथील धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे बेळगाव आणि परिसरातील पर्यटक आंबोलीत धबधब्याचा आनंद लुटत आहेत.
नैसर्गिकरित्या वनराईच्या कुशीतून कोसळणारे धबधबे पर्यटकांना साद घालत आहेत. आंबोली परिसरातील कावळेसाद पाईंट, हिरण्यकेशी, महादेवगड पाईंट आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. निसर्गरम्य परिसर, उंचावरून कोसळणारे धबधबे आणि घाटातील धुके पर्यटकांना भुरळ घालत आहेत.